सुहास कडू यांचे शिक्षण एमबीएपर्यंत झाले असून ते सध्या एका नामांकित आयटी कंपनीत कार्यरत आहेत. नोकरी सांभाळत असतानाच ते निसर्गसंवर्धनासाठी सातत्याने काम करत आहेत. दररोज सकाळी सुमारे दोन तास ते रस्त्याच्या कडेला असलेल्या जुन्या आणि दुर्मिळ झाडांच्या परिसरात जाऊन बियांचे संकलन करतात.
advertisement
सध्या सुहास 100 ते 150 प्रकारच्या बिया संकलित करून त्या विविध संस्था, पर्यावरणप्रेमी तसेच गरज असलेल्या व्यक्तींना विनामूल्य वाटप करत आहेत. संकलित बियांपासून काही ठिकाणी रोपवाटिका तयार करूनही त्या पाठवल्या जातात. गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून झाडांची ओळख, बी संकलन, रोपवाटिका निर्मिती, बीज बँकांना बिया पुरवठा तसेच वृक्षारोपण अशा विविध माध्यमांतून सुहास कडू निसर्गसंवर्धनाचे काम करत आहेत.
एका घटनेतून झाली सुरुवात
सुहास यांचे निसर्गाशी ऋणानुबंध व्यावसायिक कामामुळेच जुळले. सुहास यांना ग्रीन हिल्स या संस्थेच्या वृक्षारोपण उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली होती. हा उपक्रम पुण्यातील एका टेकडीवर राबवण्यात आला होता. सुरुवातीला ते केवळ झाडे लावण्यापुरतेच या उपक्रमात सहभागी होते. मात्र हळूहळू या कामात त्यांचा सहभाग वाढत गेला. झाड लावणे सोपे असले, तरी ती झाडे टिकवणे आणि वाढवणे किती कठीण असते, हे त्यांना प्रत्यक्ष अनुभवातून समजले.
टेकडीवर लावलेली अनेक झाडे पाण्याअभावी किंवा मातीची गुणवत्ता योग्य नसल्याने वाळत होती. ही परिस्थिती पाहून आपण कुठेतरी चुकतोय, अशी भावना त्यांच्या मनात ठाम होत गेली. यातून निसर्गसंवर्धनाचे काम करण्यास सुरुवात केली. या कामासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले आहे.





