परभणी रेल्वे स्थानकाबाहेर १० डिसेंबर रोजी भारतीय राज्यघटनेच्या प्रतिकृतीची विटंबना केल्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या पोलिसांनी अटक केलेल्या ५० जणांपैकी मृत सोमनाथ सूर्यवंशी एक होता. पोलिसांनी अटक केलेल्या ३५ वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा रविवारी परभणी जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, पदाधिकारी नेतेमंडळी खवळून उठली आहेत. कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या सोमनाथचा न्यायालयीन कोठडीच मृत्यू होत असेल तर यापेक्षा असह्य काय असू शकते, अशा तीव्र प्रतिक्रिया देऊन आरोपींविरोधात कठोर शासन करण्याची मागणी सर्वत्र जोर धरू लागलेली आहे. दोषी पोलिसांना देखील कठोर शिक्षेची मागणी समाजातून होत आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी सोमवारी परभणीला येत आहेत.
advertisement
राहुल गांधी सोमवारी दुपारी परभणीत जाऊन सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या व्यथा ऐकणार आहेत. त्यानंतर वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी देखील राहुल गांधी संवाद साधणार आहेत. लोकसभा आणि विधानसभेत परभणी हिंसाचारावरून वातावरण पेटलेले असताना राहुल गांधी यांच्या दौऱ्याने परभणी पुन्हा राजकारणाच्या केंद्रस्थानी असणार आहे.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे संसदेत जोरदार गदारोळ झाला होता. देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि आंबेडकरी चळवळीतील भीमसैनिकांनी अमित शाह यांच्या विधानाचा निषेध नोंदवला. काँग्रेस-भाजपमध्ये आंबेडकर पॅशन vs फॅशन अशी लढाई सुरू असताना इकडे परभणीत झालेल्या भीमसैनिकाच्या मृत्यूच्या बातमीने राज्यातही आंबेडकरी संघटनांमध्ये तीव्र रोष आहे.
परभणी हिंसाचार प्रकरण
परभणी हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करुन सोमनाथ सूर्यवंशीसह ५० जणांना अटक केली होती. १० डिसेंबर रोजी घडलेल्या घटनेनंतर झालेल्या आंदोलनात सोमनाथला १२ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली आणि १४ डिसेंबर रोजी त्याला न्यायालयीन कोठडीत धाडण्यात आले. न्यायालयीन कोठडीत असतानाच त्याचा मृत्यू झाल्याने विविध पोलिसांच्या भूमिकेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
