मुंबई: जवळपास २० वर्षानंतर एकत्र आलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीने राज्यातील समीकरणे बदलणार असल्याची चर्चा सुरू आहे. महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभांचा धडाका असणार आहे. मात्र, त्याआधीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. या मुलाखतीत युतीत आल्यानंतर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पहिला वार केला आहे.
advertisement
खासदार संजय राऊत आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ही ठाकरे बंधूंची बहुप्रतीक्षित मुलाखत घेतली आहे. या संयुक्त मुलाखतीमुळे ठाकरे गट आणि मनसे यांचा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा अजेंडा समोर येणार असल्याचे संकेत आहेत. दोन्ही पक्षांनी संयुक्तपणे मुंबई महापालिकेसाठी वचननामा जाहीर केल्यानंतर आता मुलाखत दिली आहे.
या मुलाखतीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची आक्रमक शैली दिसून आली. राज्यातील राजकारणापासून ते मुंबईतील विविध समस्यांबाबतही यामध्ये भाष्य झाल्याचे दिसून येत आहे. भ्रष्टाचाराबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलूच नये असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. दुर्देवाने आजचे राज्यकर्ते हे मुंबईकर नाहीत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. तर, मुंबईकरांना काय हवंय हे इथं जन्माला आल्याशिवाय कळणार नसल्याचे राज यांनी म्हटले. महेश मांजरेकर यांनी मुंबईतील वाहतूक समस्या आणि इतर प्रश्न उपस्थित केल्याचे टीझरमध्ये दिसून आले.
मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आल्याने महायुतीला मोठं आव्हान निर्माण झाले आहे. मराठीबहुल भागातील जागा या महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्याशिवाय, काही प्रभागत मराठी मते निर्णायक असणार आहेत. अशातच ठाकरे एकत्र आल्याने किती राजकीय फरक पडेल, हे निकालातून दिसून येईल.
