रोहित पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित केले. डीजीसीएच्या अजित पवारांच्या अपघाताबाबतच्या अहवालाची चिरफाड करत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. व्हीएसआर कंपनीचे लागेबंध, त्यांच्याकडून होत असलेल्या नियमांच्या उल्लंघनाकडेही रोहित पवारांनी लक्ष वेधले. या दरम्यानच त्यांनी एकनाथ शिंदे यांचाही घातपात होणार होता का, असा सवाल केला आहे.
advertisement
नेमका दावा काय?
रोहित पवार यांच्या दाव्यानुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसला जात असताना त्यांच्या विमानाचा 'फ्लाईट प्लॅन' योग्य नसल्यामुळे दोन देशांनी त्यांचे विमान पाडण्याची धमकी दिली होती. रोहित पवार म्हणाले, "आंतरराष्ट्रीय प्रवास करताना फ्लाईट प्लॅन आणि संबंधित देशांची परवानगी आवश्यक असते. एकनाथ शिंदे हे दावोसला जात असताना त्यांचे विमान इराणच्या हवाई हद्दीत शिरले. त्यावेळी इराणने इशारा दिला की, जर तुम्ही विमानाचा मार्ग आत्ताच्या आत्ता बदलला नाही, तर आम्ही तुमचे विमान पाडू."
इराणनंतर इराकनेही रोखले विमान?
रोहित पवारांनी पुढे सांगितले की, इराणच्या इशाऱ्यानंतर हे विमान इराकच्या दिशेने वळवण्यात आले. मात्र, तिथेही तसाच प्रकार घडला. इराकनेही परवानगी नसल्याचे सांगत विमान पाडण्याची धमकी दिली. अखेर हे विमान बहरीनला उतरवण्यात आले आणि तिथे सर्व कायदेशीर परवानग्या पूर्ण केल्यानंतरच विमानाचे पुढील उड्डाण झाले.
VSR कंपनीवर निशाणा
रोहित पवार यांनी या संपूर्ण प्रकरणासाठी VSR कंपनीच्या कारभाराला जबाबदार धरले आहे. "या कंपनीने उपमुख्यमंत्र्यांचा जीव धोक्यात घातला होता का? असा प्रश्न निर्माण होतो. ज्याप्रमाणे अजित पवारांच्या विमानाबाबत प्रश्नचिन्ह आहे, तसाच काहीसा प्रकार एकनाथ शिंदेंच्या बाबतीतही घडणार होता का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
