दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांमध्ये भारतीय जनता पक्षाने आपले मत मांडल्याने आता प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे. अजित पवार यांची इतर नेत्यांशी विलिनीकरणाच्या अनुषंगाने चर्चा सुरू असती तर मला सांगितले असते, असे म्हणून अशा कोणत्याही चर्चा सुरू नव्हत्या, असेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचित केले. त्यावर अजित पवार यांचा तेराव्याचा विधी झाला की सगळं सांगतो, असा इशारा रोहित पवार यांनी दिला.
advertisement
विलिनीकरणाच्या बाबतीत काय चर्चा झाली?
विलिनीकरणाच्या अनुषंगाने काही दावे प्रतिदावे सुरू आहेत. पवार घराण्यातच सध्या दु:खाचे वातावरण आहे. एकदा अजित पवार यांच्या तेराव्याचा धार्मिक विधी होऊ द्यात. विलिनीकरणाच्या बाबतीत काय काय चर्चा झाली होती ते मी सांगतो, असे रोहित पवार म्हणाले.
अनुभवी नेत्यांचे म्हणणे सुनेत्रा काकींनी ऐकले असावे
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीसाठी घाई झाली का, असे विचारले असता रोहित पवार म्हणाले, त्यांचा पक्ष वेगळा आहे. त्यांचे पक्षाचे प्रमुख लोक प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे त्या अनुषंगाने चर्चा करीत होते. मुख्यमंत्री यांच्याशी बोलत होते. मला असे कळाले की त्यानंतर त्यांची सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा झाली. या बोलण्यानंतरच सुनेत्रा काकी पवार यांच्या शपथविधीचा निर्णय घेण्यात आला. अनुभवी नेत्यांचे म्हणणे सुनेत्रा काकींनी ऐकले असावे. तेरावा होत नाही तोपर्यंत आम्ही कोणतीही राजकीय भूमिका घेणार नाही.
दादांसोबत काय काय चर्चा झाली हे तेराव्यानंतर सांगेन
देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, मी पत्रकार परिषद घेऊन त्या संदर्भात भाष्य करणार आहे. आता राजकीय बोलणे योग्य होणार नाही. दादांसोबत काय चर्चा झाली हे मी सांगेन. कारण या सगळ्या प्रक्रियेत मी होतो.
