सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीच्या दरम्यान मोठा राडा झाला होता. नाट्यमय ठरलेल्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली होती. मात्र, या दरम्यान पोलिसांच्या भूमिकेवरून मोठा वाद निर्माण झाला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, मंत्री मकरंद पाटील यांना धक्काबुक्की झाल्याची घटना घडली होती. या राड्याचे पडसाद विधीमंडळातही उमटेल होते. अखेर या प्रकरणी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली.
advertisement
मंत्री शंभूराज देसाई यांनी तुषार दोशी यांच्यावर सभागृहात गंभीर आरोप केले होते. याची दखल घेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दोशींना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश सरकारला दिले होते. उपसभापतींच्या या निर्णयावर भाजपचे नेते, मंत्री जयकुमार गोरे यांनी सभागृहात तीव्र आक्षेप नोंदवला. सभागृहाच्या कायदेशीर मर्यादा आणि प्रशासकीय प्रक्रियेचे दाखले देत ही कारवाई स्थगित करण्याची मागणी केली होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सभापतींना निर्देश देण्याची मुभा आहे, मात्र आदेश देता येत नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर सभापती राम शिंदे यांनी नीलम गोऱ्हे यांच्या निलंबनाच्या निर्णयाला स्थगिती देत चौकशीचे आदेश दिले.
दरम्यान, एकीकडे तुषार दोशी रजेवर असल्याची चर्चा असतानाच, मंत्र्यांनी घेतलेल्या एका व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये (VC) दोशी अचानक हजर झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, आता समोर आलेल्या माहितीनुसार, दोशी यांनी रजेसाठी आधीच अर्ज केला होता आणि ३० मार्च ते ६ एप्रिल या काळात त्यांची रजा मंजूर आहे. सध्या साताऱ्याचा अतिरिक्त कार्यभार अप्पर पोलीस अधीक्षकांकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे आयपीएस तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
