महायुतीत ज्याचा आमदार त्याची जाहा असे अलिखित सूत्र ठरले असल्याने फलटणमधून पुन्हा एकदा आमदार दीपक चव्हाण यांना उमेदवार मिळणार हे निश्चित होते. परंतु दीपक चव्हाण यांच्या मनात बक्षबदलाविषयी चलबिचल सुरू होती. हेच हेरून अजित पवार यांनी थेट फोनवरून जनतेसमोर दीपक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली. परंतु उमेदवारी जाहीर केल्याच्या १५ दिवसांतच त्यांनी मनगटावरील घड्याळ सोडून तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला.
advertisement
दीपक चव्हाण म्हणाले, राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून मी पक्षात कार्यकर्ता म्हणुन काम करतोय. पक्षाने मला २००९ ला फलटणमधून लढण्याची संधी दिली. तेव्हापासून आजपर्यंत फलटणचे प्रतिनिधित्व करतो आहे. मधल्या काळात जेव्हा पक्षात फूट पडली तेव्हा कुणाकडे जायचे हे धर्मसंकट आमच्यासमोर होते. तेव्हा आम्ही अजित पवारांसोबत गेलो. लोकांच्या विकासाच्या मागण्या होत्या. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी रामराजेंच्या निर्णयामुळे आम्ही अजित पवारांसोबत गेलो. मात्र इथले स्थानिक भाजप नेतृत्व आणि आमच्यात प्रचंड मतभेद आहेत. राज्याच्या भाजप वरिष्ठ नेतृत्वाकडून त्यांना ताकद मिळत आहे. त्याचा वापर करून स्थानिक नेतृत्व आमच्या कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी करत आहेत. आमच्या या दुखण्यावर अजित पवार काहीच करु शकले नाहीत, असे दीपक चव्हाण म्हणाले.
आमच्या अडचणी आम्ही अजित पवार यांच्या कानावर घातल्या होत्या. त्यांच्याकडे आमच्या व्यथा आम्ही मांडल्या होत्या. त्यांनी आमच्या प्रश्नांची दखल का घेतली याची आम्हाला कल्पना नाही.
अजितदादांच्या पक्षाच्या मी राजीनामा मेल केला आहे. उद्या प्रत्यक्ष राजीनामा देणार आहे, असे त्यांनी सांगितले. तुमचा निर्णय पक्षाच्या अध्यक्षांना कळवला का? असे विचारले असता, आम्ही निर्णय घेतल्यानंतर अजित पवारांशी आमचे बोलणे नाही झाले किंबहुना फोनवरूनही चर्चा झाली नाही, असे त्यांनी सांगितले.
