मंत्रिमंडळाचा शपथविधी 12 डिसेंबरला होत असून मंत्रिमंडळात कोणाला सामील करायचे याचा सर्वस्वी निर्णय शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांना दिला असून त्यांचा निर्णय सर्वांना मान्य असेल, असे शंभूराज देसाई यांनी सांगितले. आमच्या पक्षाचे सर्वाधिकार शिंदे यांना असल्याने अंतिम निर्णय तेच घेतील, असेही त्यांनी सांगितले. खातेवाटपावर विचारले असता, वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेतून अंतिम मार्ग काढला जाईल, असे त्यांनी सांगितले.
advertisement
मारकडवाडीमधील ईव्हीएमवर तेथील उमेदवाराने आक्षेप घेतलेला आहे. मात्र वस्तुस्थितीवर सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे. अनेक ठिकाणी महायुतीचा उमेदवार निवडून येईल असे वाटत असताना महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. जिंकले की ईव्हीएम चांगले आणि हरले की ईव्हीएमवर आक्षेप घ्यायचा, असे कसे चालेल? असे शंभूराज देसाई यांनी विचारले.
महाविकास आघाडीचा महाराष्ट्रात दारुण पराभव झाला. त्यापासून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. पवार साहेब जेष्ठ नेते आहेत. आपण सर्वांनी न्याय व्यवस्थेचा आदर केला पाहिजे. निर्जीव मशिनवर खापर फोडण्यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेने का नाकारले याचे विश्लेषण करावे, असा सल्लाही शंभूराज देसाई यांनी दिला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून उद्धव ठाकरे यांच्या शिवेसेच्या अधिकृत फेसबुक पेजला फॉलो केल्याचे समोर आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या कृतीमुळे महाराष्ट्रातील राजकारणात नेमके काय घडत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यावर बोलताना देसाई म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी ठाकरे शिवसेनेच्या अधिकृत फेसबुक पेजला फॉलो केल्याची माहिती मला नसून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय बाळासाहेब भवनमधून दिली जाईल. तोपर्यंत मी बोलणे उचित होणार नाही, असे ते म्हणाले.