मुंबई महानगर क्षेत्रात सपशेल पराभव
मुंबई महानगर क्षेत्रातील (MMR) राजकारण नेहमीच चुरशीचे असते. मात्र, यावेळी शरद पवार यांच्या पक्षाला या भागात मोठी किंमत मोजावी लागली आहे. नवी मुंबई, उल्हासनगर, मिरा-भाईंदर, वसई-विरार आणि पनवेल यांसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. या भागात पक्षाची ताकद कमी झाल्याचे चित्र निकालांवरून स्पष्ट दिसत आहे. मुंबईत ठाकरे बंधूंच्या युतीत लढताना पवारांच्या राष्ट्रवादीने एका जागेवर विजय मिळवला.
advertisement
उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही निराशा
उत्तर महाराष्ट्रात जिथे पक्षाची मोठी फळी होती, तिथेही पक्षाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. नाशिक, मालेगाव, धुळे आणि जळगाव या चारही प्रमुख शहरांमध्ये पक्षाला खाते उघडण्यात अपयश आले. विदर्भातील परिस्थितीही वेगळी नव्हती. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरसह अमरावती आणि चंद्रपूरमध्येही राष्ट्रवादीला यश मिळवता आले नाही.
बालेकिल्ल्यांना भगदाड?
सर्वात धक्कादायक निकाल पश्चिम महाराष्ट्रातून आले आहेत. शरद पवार यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या भागात पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर आणि इचलकरंजी या महापालिकांमध्ये पक्षाची पाटी कोरीच राहिली. मराठवाड्यातही नांदेड-वाघाळा, परभणी आणि जालना या शहरांनी पवारांच्या पक्षाला नाकारल्याचे पाहायला मिळत आहे.
निकालाचा परिणाम
हे निकाल शरद पवार गटासाठी धोक्याची घंटा मानले जात आहेत. महायुतीच्या वाढत्या प्रभावामुळे आणि पक्षांतर्गत झालेल्या फुटीमुळे मतदारांनी पवारांच्या पक्षाकडे पाठ फिरवली का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. १८ शहरांमधील हा 'भोपळा' पक्षाच्या आगामी रणनीतीवर मोठा परिणाम करण्याची शक्यता आहे.
