राज्यात महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. ज्या पवारांच्या राष्ट्रवादीने एकेकाळी पश्चिम महाराष्ट्रावर हुकूमत गाजवली त्यांना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का बसला. सोलापुरात चार आमदार निवडून आणून मोहिते पाटलांनी पक्षाची इज्जत वाचवली. निकाल लागून २४ तास झाले तरी शरद पवार यांची प्रतिक्रिया आलेली नव्हती. रविवारी शरद पवार कराडला आले असता, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पराभवाची कारणमीमांसा केली.
advertisement
आमची पिढी गांधी नेहरूंच्या विचारांची, आताचा तरूण वर्ग भाजपबरोबर
ज्या ज्यावेळी लोक सोडून गेले, त्यानंतरच्या निवडणुकीत लोकांनी त्यांना पराभूत केले. परंतु यंदा लोकांनी आम्हाला सोडून गेलेल्यांना पराभूत करण्याचा कौल घेतला नाही. शाहू फुले आंबेडकरांचा विचार आणि यशवंतरावांचा संस्कार मानणारी आमची पिढी होती. परंतु आत्ताचा तरूण वर्ग भाजपबरोबर गेला. आमच्यातून बाहेर गेलेले लोक होते, त्यातल्या काही लोकांना यश मिळाले. त्यातल्या काही लोकांनी अनेक वर्षे चव्हाण-गांधी-नेहरू विचारांच्या मुशीत घालवले, हे नाकारता येत नाही, असे शरद पवार म्हणाले.
निवृत्तीच्या प्रश्नावर विरोधकांना उत्तर
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या वाट्याला पराभव आल्याने तुम्ही निवृत्ती घ्यावी, असे विरोधक सांगत आहेत, असे विचारले असता, मी काय करायचे हे मी आणि माझे सहकारी ठरवू, असे प्रत्युत्तर पवार यांनी दिले.
घरी बसणार नाही, पुन्हा महाराष्ट्रभर जाईन
तुमच्या राजकीय जीवनात तुम्हाला अनेक धक्के बसले, महाराष्ट्राचा कालचा निकाल हा धक्का तुमच्यासाठी किती मोठा आहे, असे विचारले असता, आज मी कऱ्हाडमध्ये आहे. एखाद दुसरा असता तर घरी बसला असता. मी घरी बसणारा नाही. पुन्हा एकदा नव्या जोमाने कर्तृत्ववान पिढी उभी केली पाहिजे, हाच आमचा आता कार्यक्रम असेल.
