इंजिनमधून आवाज अन् होत्याचं नव्हतं झालं!
गुरुवारी सकाळी ९ वाजता माधव श्रीवाड नेहमीप्रमाणे कोपदेव हिप्परगा येथील जिल्हा परिषद शाळेत हजर झाले होते. मात्र, काही वेळातच त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी घरची वाट धरली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, काजळी पाटीजवळ त्यांच्या मारुती ८०० कारच्या इंजिनचा मोठा आवाज येत होता. काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात येण्यापूर्वीच कार वेगाने पुलाच्या कठड्यावर आदळली.
advertisement
बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही
कठड्याला धडक बसताच कारने क्षणात पेट घेतला. आग इतकी भीषण होती की माधव श्रीवाड यांना गाडीचा दरवाजा उघडून बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले आणि माधव श्रीवाड यांचा गाडीतच होरपळून मृत्यू झाला.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. गाडीचंही मोठं नुकसान झालं होतं.
एक हसते-खेळते कुटुंब उध्वस्त
मृत माधव श्रीवाड यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती. आजारपणामुळे घरी परतणे त्यांच्यासाठी शेवटचा प्रवास ठरेल, अशी पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती. काळाने अखेर झडप घातली आणि चांगला शिक्षक हिरावून नेला. कुटुंबियांवरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
