शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानचे कर्मचारी विकास रामदास दिवटे यांच्या आत्महत्या प्रकरणाला आता एक नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. मृताने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत (सुसाईड नोट) आणि कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीत भोंदू बाबा अशोक खरात याचे नाव स्पष्टपणे असूनही, पोलिसांनी त्याचे नाव दोषारोपपत्रातून (चार्जशीट) वगळल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
काय आहे प्रकरण?
advertisement
९ जून २०२२ रोजी विकास दिवटे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं होतं. या प्रकरणात त्यांच्या भावाने तक्रार नोंदवली होती. विकास यांचे सासरे अशोक सदाफळ, मेहुणा प्रदीप सदाफळ आणि साडू विलास गवळी यांच्यासह खरातने मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले, असे तक्रारीत म्हटले होते.
विकास यांच्या सासरच्या मंडळींनी त्यांना अशोक खरात या भोंदूबाबाकडे नेले होते. तिथे खरातने विकास यांना 'जीवे मारण्याची' आणि 'नोकरी घालवण्याची' धमकी दिली होती. या मानसिक त्रासाला कंटाळून विकास यांनी आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केलेल्या सुसाईड नोटमध्येही खरातच्या त्रासाचा उल्लेख होता. घटनास्थळी पोलिसांना मृताने स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली चिठ्ठीही सापडली होती, त्यात या सर्वांच्या त्रासाचा उल्लेख होता, मात्र तरीही कोणतीच कारवाई झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
