ठाणे जिल्ह्यातील महापालिकांमध्ये वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहे. शिवसेना शिंदे गटाला खिंडार पाडण्यास भाजपने सुरू केले आहे. उल्हानगरमध्येही राजकीय वातावरण गरम झाले आहे.
उल्हासनगर शहरातील राजकीय समीकरणे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलली आहेत. अशातच शुक्रवारी रात्री राडा झाला. शिवसेना (शिंदे गट) सोडून नुकतेच भाजपात प्रवेश केलेल्या माजी नगरसेविका शुभांगी बेहनवाल यांचे पती मनोहर बेहनवाल यांच्यावर काही व्यक्तींनी हल्ला करत मारहाण केली. या घटनेमुळे शहरातील राजकीय तणाव उफाळून आला असून भाजप–शिंदे गटातील संघर्ष आता थेट रस्त्यावर उतरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
advertisement
काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र करत शुभांगी मनोज बेहनवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर स्थानिक शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या कार्यकर्त्यांशी त्यांचे खटके उडत आहेत. मनोहर बेहनवाल आणि योगेश पवार हे हिराघाट परिसरात चर्चा करीत असताना हा हल्ला घडला. मिळालेल्या सूत्रांनुसार, शीलरत्न जाधव आणि रतन उर्फ बाळा गायकवाड यांच्या सूचनेवरून सचिन आहेर आणि त्याच्यासोबत पाच ते सहा जण अचानक दोघांवर धावून गेले. “राजेंद्र चौधरी यांच्या विरोधात काम करतोस काय?” असा जाब विचारत त्यांनी बेहनवाल यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अचानक झालेल्या या हल्ल्याने परिसरात काही काळ भीती आणि गोंधळ निर्माण झाला.
या प्रकरणी मनोहर बेहनवाल यांनी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी संबंधित आरोपींवर गुन्हा नोंदवला आहे. हल्ल्याचे मूळ कारण राजकीय सूडभावना आहे की स्थानिक वर्चस्वाचा वाद, याबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
शहरात भाजप आणि शिंदे गटामधील अंतर्गत संघर्ष उफाळत असल्याचे अनेकांचे मत आहे. या हल्ल्यानंतर दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांकडून कठोर प्रतिक्रिया येण्याची शक्यता असून उल्हासनगरातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
