भाजपने सर्वाधिक ११७ नगराध्यक्षपदे जिंकून महायुतीत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. मात्र, हिंगोली आणि नंदुरबार या दोन जिल्ह्यांत भाजपची खातेही उघडली नाही. नागपूर जिल्हा भाजपचा प्रमुख बालेकिल्ला ठरला असून येथे तब्बल २२ नगराध्यक्ष भाजपचे निवडून आले आहेत. याखेरीज अहिल्यानगर, जळगाव, सातारा आणि अमरावती या जिल्ह्यांतही भाजपचा वरचष्मा दिसून आला. भाजपला दोन, शिवसेनेला दहा तर राष्ट्रवादी काँग्रेसला तब्बल १७ जिल्ह्यांमध्ये एकही नगराध्यक्षपद मिळवता आलेले नाही.
advertisement
शिवसेना शिंदे गटाने ५३ नगराध्यक्षपदे जिंकली असली तरी दहा जिल्ह्यांत पक्षाला एकही यश मिळालेले नाही. मात्र, जळगाव जिल्ह्यात शिवसेनेने सर्वाधिक ६ नगराध्यक्षपदे जिंकून आपली ताकद दाखवली आहे. नाशिक, धाराशिव, पुणे, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांतही शिवसेनेचा प्रभाव दिसून आला.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने ३७ नगराध्यक्षपदे जिंकली असून तब्बल १७ जिल्ह्यांत पक्षाचे खाते उघडलेले नाही. पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा प्रमुख बालेकिल्ला ठरला असून येथे १० नगराध्यक्ष या पक्षाचे निवडून आले आहेत. नाशिक, बीड, रायगड, अमरावती आणि नांदेड या जिल्ह्यांतही राष्ट्रवादीचा प्रभाव जाणवला. दरम्यान, राज्याबाहेरील प्रादेशिक पक्षांनी ४, नोंदणीकृत पक्षांनी २८ तर अपक्षांनी ५ नगराध्यक्षपदे जिंकली आहेत.
प्रदेशनिहाय प्रभाव स्पष्ट
या निवडणुकीत महायुतीतील मित्रपक्षांचे प्रदेशनिहाय प्रभावक्षेत्र स्पष्ट झाले आहे. विदर्भात भाजप, उत्तर महाराष्ट्रात शिवसेना शिंदे गट तर पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची पकड अधिक मजबूत असल्याचे निकालांतून दिसून आले. नागपूरमध्ये भाजप, पुण्यात राष्ट्रवादी आणि जळगावमध्ये शिवसेनेने वर्चस्व सिद्ध केले आहे.
काँग्रेसचे चंद्रपूरमध्ये यश
विरोधी बाकांवरील महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने २८ नगराध्यक्षपदे जिंकत लक्षणीय कामगिरी केली आहे. स्थानिक आघाडीसह आपले ४१ नगराध्यक्ष निवडून आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. तर, राज्यात १००३ नगरसेवक जिंकल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसला सर्वाधिक यश चंद्रपूर जिल्ह्यात मिळाले असून येथे ७ नगराध्यक्षपदे पक्षाच्या वाट्याला आली आहेत. ठाकरे गटाच्या शिवसेनेने ९ तर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीने ७ नगराध्यक्षपदे जिंकली आहेत. शरद पवार गटाला कोणत्याही जिल्ह्यात एकापेक्षा अधिक नगराध्यक्षपदे मिळवता आलेली नाहीत, तर ठाकरे गटाला यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक दोन नगराध्यक्षपदे मिळाली आहेत.
