सिंधुदुर्ग विभागातील एसटीच्या तब्बल 230 बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. या प्रकारामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. तसेच प्रवशांना बसअभावी ताटकळत बसावं लागत आहे.त्यामुळे प्रवाशांचा मोठा मनस्ताप झाला आहे.
बस का रद्द केल्या?
मुंबईस्थित चाकरमान्यांना आणण्यासाठी सिंधुदुर्ग विभागातील 110 बसेस मुंबईला रवाना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 230 बस फेऱ्या या रद्द करण्यात आल्या आहेत.यामध्ये कोल्हापूर तुळजापूर सोलापूर रत्नागिरी पुणे पणजी या लांब पल्ल्याच्या गाड्यांचा समावेश आहेत.
advertisement
खरं तर चाकरमान्यांना आणण्यासाठी या बसेस पाठवल्यामुळे जिल्ह्यांतर्गत सावंतवाडी कुडाळ मालवण कणकवली या गावातील अंतर्गत गावामध्ये फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.त्यामुळे गणेशोत्सवाच्या तयारीला लागलेल्या ग्रामस्थांनी आणि कोकणात पोहोचलेल्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय झाली आहे.
तालुका वार रद्द झालेल्या फेऱ्या
सावंतवाडी 68
मालवण 30
कणकवली 66
कुडाळ 20
देवगड 16
विजयदुर्ग 17
वेंगुर्ले 13
अशा मिळून 230 बस फेऱ्या रद्द केल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुंबईवरून येणाऱ्या गणेश भक्ताने देखील यावर नाराजी व्यक्त केली आहे.
एसटी बस हाऊसफुल्ल
गणपतीच्या स्वागतासाठी मुंबई,ठाणे, पालघर विभागातून कोकणात जाण्यासाठी कोकणवासियांनी एसटीला प्राधान्य दिलं आहे.त्यामुळे एसटीच्या 4479 बस गट आरक्षणासह एकूण 5103 ज्यादा बसेस आतापर्यंत भरल्या आहेत.