चिंचोली एमआयडीसी परिसरात वास्तव्यास असणारे अक्षय परमेश्वर पुल्लूर (वय 37) हे पत्नी शकुंतला, मुलगा स्वराज आणि मुलाचा मित्र निखिल (वय 8) यांना घेऊन दुचाकीवरून चौबल सीट सोलापूरकडे येत होते. 3 एप्रिल 2026 रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास शिवाजीनगर येथे विनय हॉटेलसमोर दुचाकीचं टायर फुटलं.
advertisement
नियंत्रण सुटल्याने दुचाकी दुभाजकाला धडकली. स्वराजचं डोकं दुभाजकावर आदळलं आणि तो रक्तबंबाळ होऊन पडला. चिमुकल्या स्वराजनं आई-वडिलांसमोरच शेवटचा श्वास घेतला. निखिल आणि अक्षय हे गंभीर जखमी झाले, तर शकुंतला दुभाजक ओलांडून दुसऱ्या बाजूला पडली.
अक्षय हे चिंचोळी एमआयडीसीतील कंपनीत कामाला आहेत. शुक्रवारी आलेगावकडे निघताना स्वराजला पुढे बसवलं होतं. निखिलची परीक्षा असल्याने त्याला सोडण्यासाठी शकुंतला मागे बसली होती. घटना घडताच बघ्यांची गर्दी जमली, पण राधा इंगळे या धावत आल्या आणि जखमींना श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी स्वराजला मृत घोषित केले. शकुंतलाला खासगी हॉस्पिटलनंतर शासकीय रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, सदर अपघाताची सिव्हिल पोलिस चौकीत नोंद झाली असून, हवालदार महिंद्र गायकवाड तपास करत आहेत. दुपारी शवविच्छेदनानंतर स्वराजचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रुग्णालयाबाहेर नातेवाईकांचा रडण्याचा आवाज ऐकू येत होता.






