पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायन पनवेल महामार्गावर मुंबईच्या दिशेने एक भरधाव कार निघाली होती. या प्रवासादरम्यान कार चालकाला डुलकी लागल्याने त्याने डाव्या बाजूला रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन रिक्षाचालकाला भीषण धडक दिली होती. ही धडक इतकी भीषण होती की रिक्षाचा चेंदामेंदा झाला होता.
पण या अपघाताआधीच रिक्षाचालक राजेंद्र वनकळस हे आपल्या मुलासह रिक्षा महामार्गावर लावून चहा पिण्यास उतरले होते. यावेळी हे दोघेही टपरीवर चहा पित असताना हा अपघात घडला होता. त्यामुळे ऐनवेळी रिक्षातून उतरल्याने राजेंद्र वनकळस आणि त्यांच्या मुलाचे प्राण वाचले आहेत. पण दुसऱ्या रिक्षात झोपलेल्या 46 वर्षीय घनश्याम जयस्वाल यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. घनश्याम हे घरातील कर्ता पुरुष होते त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा आणि तीन मुली असा परिवार आहे. त्यामुळे घनश्याम यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
advertisement
दरम्यान या घटनेनंतर अपघातातून सुदैवाने बचावलेले प्रत्यक्षदर्शी आणि रिक्षाचालक राजेंद्र वनकळस यांनी संबंधित कार चालकाविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी मुळचे मानखुर्दचे व्यवसायाने अभियंता असलेले 26 वर्षीय विष्णू राठोड यांना अटक केली. या अटकेनंतर अपघाताचा अधिक तपास सूरू आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे.