३२ गावांना दिलासा, १० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली
जलसंपदा मंत्री तसेच अहिल्यानगरचे पालकमंत्री राधा यांनी सांगितले की, ही योजना दुष्काळग्रस्त भागासाठी जीवनदायी ठरणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक सर्व प्रशासकीय मान्यता आणि परवानग्या वेळोवेळी बैठका घेऊन पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता प्रत्यक्ष अंमलबजावणीला गती मिळणार आहे.
चार टप्प्यांत उभारली जाणार योजना
advertisement
या योजनेअंतर्गत म्हसेगाव येथून चार टप्प्यांमध्ये पाणी उपसा करण्यात येणार आहे. या प्रक्रियेत विविध पंपगृहांच्या माध्यमातून पाणी उचलून ते उच्च भागात पोहोचवले जाईल. एकूण सुमारे २०८.३४ मीटर उंचीपर्यंत पाणी उचलण्याचे नियोजन असून त्यासाठी पंपगृह क्रमांक १ ते ४ तसेच वितरण कुंडांची उभारणी केली जाणार आहे.
घोड धरणातून पाणीपुरवठा
या प्रकल्पासाठी घोड धरणाच्या जलाशयाचा मुख्य स्रोत म्हणून वापर करण्यात येणार आहे. मौजे म्हसे येथे पंपगृह उभारून तेथून पाणी उचलले जाईल. त्यानंतर हे पाणी चिखली आणि घुटेवाडी परिसरातील डोंगरावरील वितरण हौदात साठवले जाईल. येथून गुरुत्वाकर्षणाच्या सहाय्याने बंदिस्त नलिकांद्वारे पाणी गावागावांत पोहोचवले जाईल.
१९६ जलसाठ्यांना मिळणार पाणी
या योजनेत अस्तित्वातील लघुपाटबंधारे तलाव, पाझर तलाव, सिमेंट नाला बंधारे आणि गाव तलावांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. एकूण ३२ गावांतील सुमारे १९६ जलसाठ्यांमध्ये पाणी सोडण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पाण्याचे स्थानिक स्तरावर साठवण आणि व्यवस्थापन अधिक सक्षम होणार आहे.
पाणी वापराचे नियोजन निश्चित
या योजनेअंतर्गत सिंचनासाठी १.६० टीएमसी तर पिण्यासाठी ०.२० टीएमसी असे एकूण १.८० टीएमसी पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शेतीबरोबरच ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या देखील मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
विखे पाटील यांचे स्वप्न साकार होणार
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी या योजनेसाठी दीर्घकाळ पाठपुरावा केला होता. त्यांच्या स्वप्नातील हा प्रकल्प पुढील चार वर्षांत पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा निर्धार आहे. या निर्णयामुळे प्रकल्पाच्या सर्व टप्प्यांना गती मिळाली असून काम लवकर सुरू होणार असल्याचे मंत्री विखे-पाटील यांनी सांगितले.
दुष्काळी भागासाठी दिलासा
या योजनेमुळे श्रीगोंदा आणि अहिल्यानगर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पाण्याअभावी होणारे पीक नुकसान कमी होईल आणि शेती उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा आहे. एकूणच, साकळाई उपसा सिंचन योजना ही या भागाच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
