राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पार्थ पवारांवरील आरोप ते राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर भाष्य केले. सु्प्रिया सुळे यांनी म्हटले की, "अजित पवारांनी घेतलेले निर्णय त्यांच्यासोबतच गेले आहेत. आता माझा भाऊ नाही, त्यामुळे विलिनीकरणाच्या चर्चांना काहीच अर्थ उरत नाही," अशा शब्दांत त्यांनी दोन्ही गट एकत्र येण्याच्या शक्यतांना पूर्णविराम दिला.
advertisement
पार्थच्या शब्दावर माझा विश्वास
पुण्यातील गाजलेल्या मुंढवा भूखंड घोटाळ्याप्रकरणी विकास खारगे समितीने पार्थ पवार यांना 'अभय' दिल्याचा अहवाल समोर आला आहे. यावर विचारले असता सुप्रिया सुळे यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली. "महसूल विभागाचा अहवाल अद्याप अधिकृतपणे प्रसिद्ध झालेला नाही. जोपर्यंत मी तो अहवाल प्रत्यक्ष वाचत नाही, तोपर्यंत केवळ सूत्रांच्या माहितीवर भाष्य करणे लोकप्रतिनिधी म्हणून चुकीचे ठरेल," असे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणातील कौटुंबिक संवादाचा उलगडा करताना सुळे म्हणाल्या, "जेव्हा हे प्रकरण पहिल्यांदा माध्यमांमध्ये आले आणि पार्थचे नाव समोर आले, तेव्हा मी स्वतः त्याला फोन केला होता. त्यावर पार्थने मला स्पष्ट सांगितले होते की, 'आत्या, मी काहीही चुकीचे केलेले नाही.' मी माझ्या पुतण्याच्या त्या शब्दावर विश्वास ठेवला असल्याचे त्यांनी सांगितले.
