याबाबत मिळालेली माहिती अशी की, निरंजन कुलकर्णी याने नरसिम्मा रेड्डी दामोदर रेड्डी यांना जानेवारीमध्ये शहरातल्या एका मोठ्या हॉटेलमध्ये बोलावलं होतं. तिथं त्याने रेड्डी यांना आपली बड्या राजकीय नेत्यांशी ओळख असल्याचं सांगत तुमचीही ओळख करून देतो असं सांगितलं होतं. या ओळखीतून तुम्हाला कोणत्याही राज्याचं राज्यपाल पद मिळवून देईन असं आमिष दाखवलं.
advertisement
राज्यपाल बनवण्यासाठी सेवा शुल्क म्हणून १५ कोटी रुपयांची मागणीही केली. त्यानंतर पुढच्या भेटीत निरंजन कुलकर्णीने रेड्डी यांना असं काम न झाल्यास माझ्या नावावर असलेली जमीन तुमच्या नावावर करतो असं सांगितलं. यामुळे निरंजन वर रेड्डी यांचा विश्वास बकसला.
निरंजनने रेड्डी यांना पेंच व्याघ्र प्रकल्प आणि बोर व्याघ्र प्रकल्पालगत १०० एकर जमीन सरकारकडून करारावर घेतल्याची बनावट कागदपत्रे त्यांना दाखवली. याशिवाय नाशिकजवळ चांदशी इथं जागेची बनावट कागदपत्रेही दाखवून रेड्डी यांना विश्वासात घेतलं. रेड्डी यांनी निरंजन कुलकर्णीवर विश्वास ठेवला आणि फेब्रुवारी ते एप्रिल २०२४ या कालावधीत तब्बल पाच कोटी ८ लाख ९९ हजार ८७८ रुपये निरंजनला पाठवले. जेव्हा निरंजनने दाखवलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली तेव्हा ती बनावट असल्याचं समोर आलं.
रेड्डी यांनी निरंजन कुलकर्णीकडे पैशांची मागणी केली. तेव्हा त्याने पैसे देण्यास नकार देत जिवे मारण्याची धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच मुंबई नाका पोलिसांत रेड्डी यांनी तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी निरंजन कुलकर्णीला अटक केली आहे.