रात्री अडीच वाजता अग्नितांडव
मिळालेल्या माहितीनुसार, तुषार कॉलनीतील रहिवासी कार्तिक सूरसे आणि गणेश गुडापे यांनी आपल्या कार नेहमीप्रमाणे घरासमोर उभ्या केल्या होत्या. सोमवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास संपूर्ण परिसर गाढ झोपेत असताना, एका अज्ञात विकृत व्यक्तीने या दोन्ही गाड्यांना आग लावली. क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केले आणि दोन्ही गाड्या आगीच्या गोळ्यात रूपांतरित झाल्या.
advertisement
अग्निशमन दलाच्या तत्परतेने टळली मोठी दुर्घटना
गाड्यांनी पेट घेतल्याचे लक्षात येताच परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच कारंजा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. सुदैवाने, आग वेळीच विझवल्यामुळे जवळच असलेल्या घरांना झळ पोहोचली नाही, अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. मात्र, आग विझेपर्यंत दोन्ही गाड्यांचे सांगाडे उरले होते.
नागरिकांची सुरक्षा धोक्यात
आपल्या घरासमोर उभी असलेली कष्टाची गाडी सकाळी राख झालेली पाहून कार मालकांना धक्का बसला आहे. "दिवस-रात्र कष्ट करून घेतलेली गाडी कुणीतरी अशा प्रकारे जाळून टाकेल, असा विचारही केला नव्हता," अशी भावना मालकांनी व्यक्त केली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात दहशतीचे वातावरण आहे. रात्रीच्या वेळी फिरणारी ही विकृत व्यक्ती कोण? असा सवाल नागरिक विचारत आहेत.
पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान
या घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा केला असून अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहेत. ही कृती एखाद्या टोळीची आहे की कुण्या माथेफिरूचे हे कृत्य आहे, याचा तपास करणे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. आग लावणाऱ्याचा तातडीने शोध घेऊन त्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी कारंजावासीयांकडून केली जात आहे.
