महाराष्ट्रात मराठी विरुद्ध हिंदी हा जसा वाद आहे तसाच तो इतर काही राज्यात देखील आहे. राज्यात पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीला विरोध झाल्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय मागे घेतला. हा निर्णय मागे घेतल्यानंतर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले. या दोघांच्या एकत्र येण्याचा आनंद जसा अनेक शिवसैनिकांना आणि सामान्य मराठी माणसाला झाला आहे तसाच तो तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांना देखील झालाय.
advertisement
उद्धव आणि राज मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आल्याबद्दल स्टॅलिन यांनी या दोघांचे अभिनंदन केले आहे. स्टलिन यांनी एक्स वर एक मोठी पोस्ट लिहून याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
स्टॅलिन यांची पोस्ट
हिंदी थोपण्याला विरोध करण्यासाठी द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) आणि तमिळनाडूची जनता पिढ्यानपिढ्या ज्या भाषा-हक्कासाठीचा लढा लढत आहेत, तो आता राज्यांच्या सीमा ओलांडून महाराष्ट्रातही आंदोलनाच्या रूपाने वेग घेत आहे.
तमिळनाडूच्या शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवल्यासच निधी देऊ, असा संविधानाच्या विरोधात आणि अनधिकृतपणे वागणाऱ्या भाजपला स्वतः सत्तेत असलेल्या महाराष्ट्रात जनतेच्या उठावाला घाबरून दुसऱ्यांदा माघार घ्यावी लागली आहे.
हिंदी थोपण्याच्या विरोधात भाई उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आज पार पडलेली विजयी मिरवणूक आणि भाषणांची ऊर्जा अत्यंत प्रेरणादायक आहे.
“उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये तिसरी भाषा काय शिकवली जाते?” आणि “हिंदी भाषक राज्ये मागासलेली असताना, प्रगत आणि हिंदीबोलणारी नसलेली राज्यांवर हिंदी का लादत आहात?” या राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना, हिंदी आणि संस्कृतच्या प्रसारालाच प्राधान्य देणाऱ्या केंद्र सरकारकडे कोणतेही उत्तर नाही, हे मला ठाऊक आहे.
‘त्रिभाषा धोरणा’च्या नावाखाली हिंदी-संस्कृत लादणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणाला स्वीकारल्यासच ‘समग्र शिक्षा अभियान’ अंतर्गत 2,152 कोटींचा निधी देऊ, असा केंद्र सरकारचा तमिळनाडूविरोधी सूडबुद्धीचा धोरणात्मक पवित्रा बदलला जाईल का? तमिळनाडूतील शाळकरी मुलांच्या शिक्षणासाठी कायदेशीररित्या द्यायचा असलेला निधी केंद्र सरकार त्वरित वितरित करेल का?
हिंदी वर्चस्वाविरुद्ध तमिळनाडूची जनता चालवत असलेला लढा केवळ भावनिक नाही, तर तो बौद्धिक आहे! तार्किक आहे! भारताच्या बहुभाषिक-सांस्कृतिक समृद्धीचं रक्षण करणारा आहे! आणि तो द्वेषयुक्त अजिबात नाही!
हिंदीच्या जबरदस्तीमुळे भारतातील अनेक भाषांचे उच्चाटन झालेले इतिहासाला न समजता, भारताला हिंदी राष्ट्र बनवण्याच्या योजनांची जाणीव न ठेवता, “हिंदी शिकल्यासच नोकरी मिळेल” अशा गोडगोड आश्वासनांना सत्य मानणारे भोळेभाबडे काही लोक तरी आता जागे व्हायला हवेत. महाराष्ट्रातील हा उठाव त्यांच्या डोळ्यांपुढील झापडं दूर करेल, अशी आशा आहे!
तमिळला निधी न देणे, कीळडी संस्कृतीला नाकारण्याचा अहंकार, हे आम्ही चालून देणार नाही. तमिळ आणि तमिळनाडूशी भाजप करत असलेला विश्वासघात थांबवला पाहिजे. नाहीतर त्यांना आणि त्यांच्या नव्या मित्रपक्षांना तमिळनाडू पुन्हा एक धडा शिकवेल — असा धडा, जो विसरता येणार नाही!
चला एकत्र येऊया!
तमिळनाडू लढेल! तमिळनाडू जिंकेल!