महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय समीकरणांची उलथापालथ सुरू आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना शिंदे गटाला मनसेने पाठिंबा दिल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर मनसे आता मुंबई महापालिकेतही उद्धव यांची साथ सोडून थेट महायुतीला पाठिंबा देतील अशी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली आहे. राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली, तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थसाठी कधीही नसेल असे राज यांनी म्हटले.
advertisement
भाजपचा शिवसेनाप्रमुखांवरील आदर हा ढोंग...
शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. राऊत यांनी म्हटले की, भाजप कोणत्याही परिस्थितीत महापौर सोडणार नाही. शिवसेना प्रमुखांचे फोटो ते राजकीय स्वार्थासाठी वापरतात. शिवसेना प्रमुखांना मानत असतील तर त्यांनी शिवसेना फोडली नसती. ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाचे अस्तित्व नसताना निर्माण करून दिले त्यांचा पक्ष तुम्ही फोडलात. शिवसेनेशी संबंध नसताना नामर्दांच्या हाती शिवसेना दिली असल्याचा घणाघात राऊत यांनी केला.
संजय राऊत यांनी म्हटले की, मुंबईच्या महापौर पदासाठी आम्ही शिंदेंचा पाठिंबा घेणार नाही. पण काय करायचे ते पक्ष ठरवेल असे म्हटले. सत्ता मिळाली नाही म्हणून आमचा जीव कळवळत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राज यांचे लवचिकतेचे संकेत, ठाकरे गटाने काय म्हटले?
राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकेबाबत बोलताना म्हटले की, राज ठाकरे यांचा एक चांगला लेख आजच्या सामनामध्ये आला असून सगळ्यांनी वाचावा, असे त्यांनी म्हटले. आज संध्याकाळी बाळासाहेबांच्या जयंती निमित्ताने एक कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. लवचिकतेच्या मुद्यावर राज ठाकरे यांनी म्हटले की, राज ठाकरे हे एका राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी त्यांची भूमिका मांडली असेल असं राऊत यांनी म्हटले.
दरम्यान, राज यांच्या राजकीय लवचिकतेच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. महापालिका निवडणुका ठाकरे बंधूंनी एकत्रितपणे लढवल्या. सत्ता काबीज करण्यास ठाकरे बंधूंना अपयश आले. तर, मनसेचे अवघे ६ नगरसेवक निवडून आले. त्यानंतर आता राज ठाकरे हे कल्याण-डोंबिवलीनंतर मुंबईतही पाठिंबा देण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. अशातच राज ठाकरे यांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
