शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर एकीकडे उद्धव ठाकरेंनी खासदारांवर विश्वास व्यक्त करत भावनिक साद घातली. तर दुसरीकडे राज्यसभेच्या एका जागेवरून पक्षात अंतर्गत संघर्ष पाहायला मिळाला. विशेषतः खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने बैठकीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेसकडून कोणती मागणी झाली, याबाबत उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे आपल्या खासदारांना माहिती दिली.
advertisement
काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांचा मातोश्रीवर फोन...
महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी महाविकास आघाडीकडून एकच जागा निवडून येईल एवढं संख्याबळ होतं. या जागेवर काँग्रेसने आपला दावा सांगितला होता. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, के. सी. वेणुगोपाल आणि रमेश चन्नीथला यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता. विरोधी पक्षाच्या सदस्यसंख्येचे गणित जुळवण्यासाठी ही जागा काँग्रेसला सोडावी, अशी विनंती काँग्रेस नेत्यांनी केली होती. उद्धव ठाकरे यांनी ही माहिती खासदारांना देताना सांगितले की, "मी काँग्रेसला स्पष्ट सांगितले आहे की, तुम्ही या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेसशी (शरद पवार गट) बोला. आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून काय साध्य होणार?" शिवसेना आणि राष्ट्रवादीतील संभाव्य वाद टाळण्यासाठी आपण ही भूमिका घेतल्याचे ठाकरे सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
खासदारांना साद, "तुमच्या भरवश्यावरच ही लढाई..."
बैठकीची सुरुवात करताना उद्धव ठाकरे यांनी अत्यंत थेट भूमिका मांडली. ते म्हणाले, "मला भाजप आणि राष्ट्रवादीकडून निरोप येतात की तुमचे खासदार फुटणार आहेत. पण, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. ही सर्व लढाई मी तुमच्याच भरवश्यावर लढत आहे." ठाकरेंच्या या विधानाने खासदारांना बळ देण्याचा प्रयत्न केला.
