दिल्लीतील बैठकीचा 'आफ्टरइफेक्ट'?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी दिल्लीत संजय राऊत यांच्या निवासस्थानी ठाकरे गटाच्या खासदारांची एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीत खासदारांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. "उद्धव ठाकरे खासदारांना भेटत नाहीत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाकडून अपेक्षित मदत मिळाली नाही," अशा तक्रारींचा पाढा खासदारांनी वरिष्ठ नेत्यांसमोर वाचला होता.
advertisement
आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावरूनही सवाल
याच बैठकीत खासदारांनी थेट नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. "जर उद्धव ठाकरेंना प्रकृती किंवा इतर कारणांमुळे काही मर्यादा असतील, तर आदित्य ठाकरे संपूर्ण महाराष्ट्र का फिरत नाहीत?" असा रोखठोक सवालही खासदारांनी विचारला होता. खासदारांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी स्वतः मैदानात उतरत ही बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर ठाकरे गटात सगळं काही आलबेल नाही, यावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे.
'ऑपरेशन टायगर'च्या माध्यमातून पक्षात पुन्हा एकदा मोठी फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा असताना, उद्धव ठाकरे आपल्या शिलेदारांना एकत्र राखण्यात यशस्वी होतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
