रत्नागिरी आणि सिंधुदुर्गानंतर आता विदर्भात देखील लाडकी बहीण योजनेत गडबड झाल्याचं समोर आलं आहे. कोकणातल्या दोन जिल्ह्यांमध्ये मिळून जवळपास 72 हजार महिलांच्या अर्जांची फेरतपासणी केली जात आहे. रत्नागिरीतील 50 हजार महिला अपात्र ठरल्या आहेत. तर सिंधुदुर्गातील 2 हजारहून अधिक महिला अपात्र ठरल्या आहेत. त्याच पाठोपाठ आता नागपुरात देखील 19 हजार महिला अपात्र ठरण्याच्या मार्गावर आहेत.
advertisement
मुख्यमंत्री 'माझी लाडकी बहीण' योजनेत एकाच कुटुंबातील तीन ते चार महिलांनी लाभ घेतल्याचे समोर आल्याने, आता प्रशासन सतर्क झाले आहे. अशा अपात्र महिलांचा पत्ता कट होणार असून, त्यांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे.
एकाच कुटुंबातील अनेक महिलांना लाभ
या योजनेच्या नियमांनुसार, एका कुटुंबातील फक्त दोन महिलांनाच लाभ मिळतो. मात्र, काही ठिकाणी एकाच कुटुंबातील तीन किंवा चार महिलांनी अर्ज केल्याचे निष्पन्न झाले आहे. याशिवाय, वय 18 वर्षे पूर्ण नसतानाही अर्ज केल्याचे प्रकारही समोर आले आहेत. प्रशासनाने या सर्व प्रकरणांची गंभीर दखल घेतली आहे.
लाडकी बहीण योजना: कोकणातील 72,400 महिलांना झटका, खात्यात पैसेच नाही येणार!
पडताळणी सुरू, 84 हजार लाभार्थी संशयाच्या भोवऱ्यात
नागपूर जिल्ह्यात 'लाडकी बहीण' योजनेचे एकूण 5,19,276 लाभार्थी आहेत. सध्या प्रशासनाकडून विविध माध्यमांतून या सर्व लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. या प्राथमिक तपासणीत सुमारे 84,000 लाभार्थी संशयाच्या भोवऱ्यात असल्याची माहिती पुढे येत आहे.
प्रशासनाच्या पडताळणीत ज्या अर्जांमध्ये 'FSC-Multiple in Family' असा शेरा मारला जाईल, ते अर्ज बाद ठरवले जातील. या तपासणीमुळे केवळ पात्र आणि गरजू महिलांनाच योजनेचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा आहे. प्रशासनाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी अजूनही सुरूच आहे.