दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारीला झालेल्या विमान अपघातात निधन झाल्यानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली आहे तर भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झालेली आहे. अशा परिस्थितीत दोन्ही जागांवरील निवडणूक बिनविरोध व्हावी, असा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षही आग्रही आहे. मात्र काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादीच्या विरोधात उघडपणे भूमिका घेतली आहे.
advertisement
राष्ट्रवादी उमेदवार देणार नसेल तर काँग्रेस पक्ष निवडणूक लढविण्याचा विचार करेल
काँग्रेस पक्षाने राज्यसभा निवडणुकीत शरद पवार यांना पाठिंबा दिला. राज्यसभेची जागा महत्त्वाची असतानाही शरद पवार यांच्यासाठी काँग्रेसने जागेचा त्याग केला. मात्र यावेळी राहुरी आणि बारामती अशा दोन्ही जागांवरील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी उमेदवार देणार नसेल तर काँग्रेस पक्ष निवडणूक लढविण्याचा विचार करेल, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. एकप्रकारे सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेस पक्ष उमेदवार देणार असल्याचे संकेतच त्यांनी दिले आहेत.
विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
बारामती विधानसभा निवडणूक न लढवण्याबाबत खा. सुप्रिया सुळे यांनी जी भूमिका घेतली त्याच्याशी काँग्रेस पक्ष सहमत नाही. ही त्यांची भूमिका असून, याबाबत महाविकास आघाडीत कोणतीही चर्चा झालेली नाही. राज्यातील दोन जागांवरील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष तयार नसेल, तर काँग्रेस पक्ष या जागा लढण्याचा विचार करेल! बारामतीत पोटनिवडणूक लढवण्यास राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) तयार नसेल तर ती निवडणूक लढवण्याबबत काँग्रेस पक्ष विचार करेल.
पोटनिवडणुकीसंदर्भात सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?
ज्येष्ठ नेत्यांच्या जाण्यानंतर महाराष्ट्रात बिनविरोध निवडणुकीची परंपरा आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी सर्वांचीच इच्छा आहे. अगदी महाविकास आघाडीचे देखील हेच म्हणणे असेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.
