मतदारांच्या बोटावर लावण्यात येणारी शाई ही सहजपणे पुसली जात नाही. त्यामुळे बोगस, दुबार मतदानाला आळा बसला जात असल्याचे म्हटले जात होते. अनेक दिवस ही मतदानाची शाई बोटावर राहते. मात्र, आज समोर आलेल्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मतदानानंतर मतदाराच्या बोटावर लावण्यात येणारी शाई यावेळी मार्कर पेनच्या स्वरूपात वापरण्यात येत असून, ही शाई सहज पुसली जात असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या युवा सेनेचे पदाधिकारी साईनाथ दुर्गे यांनी केला होता. त्यानंतर राज्यातील अनेक ठिकाणी असाच प्रकार उघडकीस आला.
advertisement
कल्याण-डोंबिवलीमध्येही असाच प्रकार उघडकीस आला आहे. कडोंमपामधील पॅनल क्रमांक ९ मध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. मनसेच्या उमेदवार उर्मिला तांबे आणि काँग्रेस उमेदवार माधवी चौधरी यांनी याबाबत तक्रार केली. मतदानासाठी बोटाला लावलेली शाई लगेच पुसली जात आहे . हा काय प्रकार आहे? असे प्रकार करायचे असतील तर निवडणुका घेता कशाला? असा संतप्त सवाल मनसे उमेदवार उर्मिला तांबे यांनी केला.
अनेक महिला व मुले बोगस मतदान करून बोटावरील शाई लिक्विडने पुसून पुन्हा बोगस मतदान करत असल्याचा आरोप पुण्यातील काही उमेदवारांनी केला आहे. तशी तक्रार निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केल्याची माहिती आहे. तर, दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरचे पालक मंत्री संजय शिरसाट यांनी देखीाल मार्करच्या वापरावर नापसंती दर्शवली आहे. याआधी मतदानासाठी वापरण्यात येणारी शाई काही दिवस राहत असे. ती लवकर पुसल्या जात नव्हती. मात्र, मार्कर लवकर पुसला जात असल्याने बऱ्याच ठिकाणी मतदानात गोंधळ होऊ शकतो अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
तर शाई पुसली जात नाही....
महापालिका निवडणुकीत मतदान केल्यावर लावलेली शाई पुसल्याच्या तक्रारी येत आहेत. मात्र मतदान करून लगेच बाहेर पडलेल्या काही मतदारांनी शाई विशिष्ट परिस्थिती पुसत असल्याचे म्हटले. पर्मनंट मार्कर ने दोन ते तीन वेळा शाई लावल्यानंतर ही शाई सहज पुसली जात नाही. मात्र नेल पेंट रिमूव्हर किंवा लोशन लावलेल असेल, हाताला घाम आलेला असेल तर शाई पुसली जात आहे. अधिकाऱ्यांनी दोन ते तीन वेळा शाई लावल्यास ती पुसली जात नसल्याचं पुण्यातील काही मतदारांनी न्यूज १८ मराठीसोबत बोलताना सांगितले.
मुंबई महापालिका आयुक्तांनी काय सांगितलं?
मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी शाईच्या तपासणीबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. मतदारांना लावण्यात येणारी शाई ही पुसली जात असल्याची तक्रार महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली. त्यानंतर चौकशीचे निर्देश देण्यात आले. शाई बोटांच्या त्वचेला लागेल अशी गडद लावण्याची सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.
