भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, राज्यात थंडीचा कडाका वाढणार आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत आज रात्रीपासून थंडीच्या लाटेच्या इशारा देण्यात आला आहे. ही थंडीची लाट १२ डिसेंबरपर्यंत कायम राहणार आहे. हवामान तज्ज्ञ डॉ. सुप्रीत यांच्या मते, मध्य प्रदेश आणि पंजाबपासून ते पश्चिम बंगालच्या खाडीपर्यंत दक्षिणेकडे जाणारं एक सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे. याशिवाय दोन सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले आहेत.
advertisement
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात किमान तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील चार दिवसांदरम्यान किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही विभागांमध्ये आज रात्रीपासून १२ डिसेंबरपर्यंत थंडीच्या लाटेची स्थिती कायम राहील. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि उत्तरी अंतर्गत कर्नाटक या भागांत हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील दोन दिवसांत मराठवाडा यासह अन्य भागांमध्येही थंडीची लाट कायम राहील.
पुढील चार दिवस थंडीचा कडाका कायम राहील. मात्र, त्यानंतरच्या तीन दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने किंचित वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी या काळात थंडीपासून बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. धुळे, निफाड, भंडारा, गोंदिया इथे 5 अंशांवर तापमान आलं आहे.
उत्तर भारतातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात गारठा आहे. यंदा ला निनामुळे मागच्या पाच वर्षांच्या तुलनेत थंडी जास्त राहणार आहे. 2024 च्या तुलनेत यावेळी तापमान आणखी घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात या कालावधीमध्ये 4 अंशांपर्यंत नोंद करण्यात आली होती. यावेळी हा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे.
