समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, तेरखेडा-कडकनाथवाडी रस्त्यावरून दुचाकीवरून जात असताना पवनचक्कीचे साहित्य वाहून नेणाऱ्या अवजड वाहनाने जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती ही
दुचाकी पूर्णपणे चिरडली गेली आणि दोन्ही तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना कडकनाथवाडी येथील जागरूक ग्रामस्थांनी पाठलाग करून सदरील वाहन अडवले. यानंतर ग्रामस्थांनी वाहनचालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले.
advertisement
गेल्या महिन्यात देखील शेतकऱ्याला चिरडले
विशेष म्हणजे मागील महिन्यातही याच परिसरात पवनचक्कीच्या वाहनाने एका शेतकऱ्यास चिरडल्याची घटना घडली होती. त्या घटनेनंतरही पवनचक्कीच्या वाहनांच्या बेशिस्त वाहतुकीबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने पुन्हा एकदा निष्पाप जीवांचा बळी गेला असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. अवजड वाहनांची वेगमर्यादा, रात्रीची वाहतूक आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा रोष नागरिक व्यक्त करत आहेत.
वाहनांवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच वाहनचालकाची चौकशी करण्यात येत असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे तेरखेडा व कडकनाथवाडी परिसरात शोककळा पसरली असून पवनचक्कीच्या वाहनांवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे.
