नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव येथील शेतकरी अविनाश चांगदेव कवडे यांचे लग्न जुळवण्यासाठी ऑनलाईन माध्यमातून संपर्क साधण्यात आला होता. मध्यस्थामार्फत घाटंजी तालुक्यातील चोरंबा येथील सिमरन गौतम पाटील हिचा प्रस्ताव पुढे आला. घरची परिस्थिती हलाखीची असल्याचे सांगत विवाहाचा खर्च मुलाकडच्यांनी उचलावा, अशी अट सुरुवातीलाच घालण्यात आली.
दबाव टाकून अडीच लाख उकळले
advertisement
ठरल्याप्रमाणे कवडे १० फेब्रुवारी २०२६ रोजी चोरंबा येथे पोहोचले. प्रत्यक्ष भेटीत लग्न निश्चित होण्याआधीच मोठ्या रकमेची मागणी करण्यात आली. सुरुवातीला नकार दिल्यानंतरही दबाव वाढवून अखेर दोन लाख ५० हजार रुपये उकळण्यात आले. यातील दोन लाख रुपये चोरंबा येथीलच एका साथीदाराकडे, तर उर्वरित रक्कम मध्यस्थाकडे देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
पोहे आणायला गेली अन् परतलीच नाही
पैसे मिळताच ‘पोहे आणायला जातो’ असा बहाणा करत सिमरन, तिची आई व भाऊ स्कुटीवरून निघून गेले. त्याचवेळी इतर दोघे साथीदारही वेळ साधून तेथून निसटले. काही वेळातच सर्वांचे मोबाईल बंद झाले. बराच वेळ वाट पाहूनही कोणीच परत न आल्याने कवडे यांना फसवणूक झाल्याचं लक्षात आलं.
लुटेरी दुल्हनसह पाच जणांना अटक
यानंतर त्यांनी तातडीने घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच ठाणेदार केशव ठाकरे यांनी तपासाची चक्रे फिरवत सिमरन गौतम पाटील, तिची आई आशा पाटील, भाऊ करण पाटील, सहकारी सुनील राठोड आणि माणिक पवार यांना अटक केली. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१६(२) व ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
