कर्जत : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना अनेक ठिकाणी वेगवेगळे लढल्याचं चित्र आहे. आता जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा झाली आहे. पण, महायुतीमध्ये अजूनही तणाव असल्याचं चिन्ह आहे. त्यामुळे कर्जत जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती नको, असा आग्रह धरला आहे. त्यामुळे कर्जतमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि उबाठासोबत येऊ शकते आणि भाजप विरोधात शिंदेंची सेना कर्जत खालापुरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढवू शकते असं नवीन समीकरण इथं तयार झालं आहे.
advertisement
कर्जत नगरपालिका निवडणुकीत भाजपने शिंदे सेनेसोबत जाऊन चुकी केल्याचे भाजप कार्यकर्ते आता उघड उघड बोलू लागले आहेत. शिंदे सेनेसोबत गेल्याने मतदारांनी भाजपला आस्मान दाखवलं. कर्जत नगरपालिकेत एकच नगरसेवक जेमतेम मत घेऊन निवडून आल्याने आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती नको, असं जाहीररित्या भाजप कार्यकर्ते बोलू लागले आहेत.
कर्जत, खोपोली आणि माथेरान नगरपालिकेत जो दगाफटका शिंदे सेनेने दिला असल्याने त्याची पुनरावृत्ती जिल्हा परिषदेत नको म्हणून आता भाजप ही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत जिल्हा परिषदेला युती करेल, असं मत कार्यकर्त्यांनी भाजपच्या आढावा बैठकीत व्यक्त केलं आहे असं भाजपचे कर्जत खालापूर निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांनी सांगितलं.
खोपोलीमध्ये ३१ जागांपैकी ७ ते ८ जागा मिळाल्या होत्या. ४ ते ५ उमेदवार हे शिंदे गटानेच उभे केले होते. त्यांच्या पॅनलला शिंदे गटाने अपक्ष उमेदवार करून आमचे उमेदवार पाडले होते. माथेरानमध्ये सुद्धा असंच करण्यात आलं होतं. भाजपच्या विरोधात अपक्ष उमेदवार उभे केले होते. कर्जतमध्ये सुद्धा असाच अनुभव आम्हाला आला आहे. त्यामुळे इथं पराभव झाला. भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यामुळे शिंदे गटाला फायदा झाला. उलट भाजपला नगरपालिकेमध्ये नुकसान झालं, त्यामुळे शिंदेंच्या सोबत जाण्यास कार्यकर्त्यांचा विरोध आहे, असंही किरण ठाकरे यांनी सांगितलं.
त्यामुळे आता कर्जत आणि खालापूरमध्ये जिल्हा परिषदेला अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेना उबाठा यांच्यासोबत आता भाजप सामील होईल, अशी शक्यता आहे.
शिंदे शिवसेनेनं उमेदवार केले जाहीर
दरम्यान, शिंदे सेनेनं कर्जत खालापूर तालुक्यात जिल्हा परिषदचे संभाव्य उमेदवार जाहीर केल्याने आता भाजपला राष्ट्रवादी आणि शिवसेना उबाठासोबत जाण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचं उघड होत आहे.
