पुणे : शेती अभ्यासपूर्ण करा, असा सल्ला कृषीतज्ज्ञ वर्षानुवर्षे देताहेत. त्याचाच परिणाम गेल्या काही वर्षांपासून पाहायला मिळतोय, कृषी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढतेय. हे विद्यार्थी भविष्यात एक यशस्वी शेतकरी, कृषी व्यवसायिक किंवा कृषीतज्ज्ञ व्हावे यासाठी या महाविद्यालयांकडूनही विशेष उपक्रम राबवले जातात. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या महाविद्यालयाबाहेर तर एक रसवंतीगृह आहे जे चक्क विद्यार्थी चालवतात. महत्त्वाचं म्हणजे हे साधंसुधं नाही, तर आधुनिक पद्धतीचं रसवंतीगृह आहे.
advertisement
व्यवसायिक दृष्टिकोनातून विचार करून हा उपक्रम सुरू करण्यात आला. बरं हा आताचा उपक्रम नाहीये हं, तर साल 1992 पासून या महाविद्यालयाबाहेर रसवंतीगृह सुरू आहे. महाविद्यालयात चतुर्थ वर्षात शिकणारे विद्यार्थी इथं काम करतात.
हेही वाचा : 55 पिकांची शेती अन् ग्रामीण संस्कृतीचं दर्शन, पुण्याजवळचा आनंदमळा पाहिलात का?
उन्हाळा सुरू झाला की, शीतपेयाच्या ग्राहकांची संख्या आपसूक वाढते. ऊसाच्या रसाला तर या ऋतूत मोठी मागणी मिळते. त्यामुळे रसवंतीगृहाच्या ग्राहकांची संख्या वाढते. हीच बाब लक्षात घेऊन महात्मा फुले कृषी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर रसवंतीगृह सुरू केलं जातं. इथं 20 रुपयांप्रमाणे ऊसाच्या रसाची विक्री होते, त्यात लिंबाचा रस, आलं आणि पुदिनाही घातला जातो, ज्यामुळे रस आणखी चवदार होतो.
हेही वाचा : पुणेकर हुश्शार! 50व्या वर्षी शिक्षण, सुरू केला मसाल्यांचा व्यवसाय, आज जगभरात नाव
विशेष म्हणजे केवळ हे रसवंतीगृह चालवण्याचं काम विद्यार्थी करत नाहीत, तर ऊस तोडणं, त्याची साल काढणं इथपासून रस बनवण्यापर्यंत सर्व कामं तेच पाहतात. तसंच विद्यापीठानं प्रसारित केलेल्या दामोदर आणि को 15012 या खास ऊसाच्या जातींपासून रस काढला जातो. हे उत्तम दर्जाचे ऊस असल्यामुळे त्यांच्या रसालाही चांगली मागणी मिळते.
साधारण 6 महिने सुरू असलेल्या या रसवंतीगृहातून विद्यार्थ्यांना व्यवसायाचं प्रशिक्षण मिळतंच, शिवाय त्यातून मिळणाऱ्या नफ्याचा 50 टक्के भाग विद्यार्थ्यांना दिला जातो. म्हणजेच अनुभव आणि त्यातून कमावण्याची संधीही विद्यार्थ्यांना मिळते. महाविद्यालयाच्या ऍग्रोनोमी कृषीविद्या विभागाचे प्राध्यापक डॉ. विजय जाधव यांनी ही माहिती दिली आहे.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा





