सातारा: सध्याच्या काळात पारंपरिक शेतीला फाटा देत अनेक शेतकरी फळबागांच्या शेतीकडे वळत आहेत. साताऱ्यातील डोंगर कपारीत असणाऱ्या धुमाळवाडीतील शेतकऱ्यानं तैवान पिंक पेरूची बाग लावलीये. एक एकर क्षेत्रातून प्रगतशील शेतकरी संजय धुमाळ यांनी 12 ते 15 टन माल काढलाय. विशेष म्हणजे कोणत्याही रासायनिक औषध फवारणीशिवाय केलेल्या या पेरू लागवडीतून त्यांना लाखोंची कमाई होत आहे.
advertisement
कशी केली तैवान पिंक पेरूची लागवड?
सातारा जिल्ह्यातील डोंगर-कपारीत असणाऱ्या धुमाळवाडी या गावाला फळांचं गाव म्हणून ओळखलं जातं. येथील प्रगतशील शेतकरी संजय धुमाळ यांनी आपल्या एक एकर शेतात 400 तैवान पिंक पेरूच्या रोपांची लावगड केली. विशेष म्हणजे कमी पाण्यात आणि कमी खर्चात त्यांनी आधुनिक शेतीचा अनोखा प्रयोग केला. कोणतेही रासायनिक खत आणि फवारणी न करता सेंद्रिय खतांचा वापर केला. त्यामुळे एका एकरात तब्बल 12 ते 15 टन माल निघाला.
दुष्काळी भागात केली रंगीत ढोबळी मिरचीची लागवड; 2 एकरात शेतकरी कसा झाला मालामाल? Video
एका एकरात 9 लाखांचे उत्पन्न
तैवान पिंक पेरूच्या बागेत सेंद्रीय खतांचा वापर केल्याने फायदा झाला. एका पेरूचे वजन अर्धा किलोपेक्षा जास्त आहे. हा पेरू लहान असतानाच त्याचे बॅगिंग केले जाते. एका झाडावर 120 ते 130 फळांना बॅगिंग केले. या फळांतून एका झाडाला 60 ते 70 किलो माल निघाला. एका एकरात 12 ते 15 टन पेरू निघाले. त्यामुळे एकरी 9 लाखांचे उत्पन्न मिळाल्याचे शेतकरी धुमाळ यांनी सांगितले.
दुष्काळी भागातील शेतकऱ्यानं यशस्वी केला सफरचंदाच्या शेतीचा प्रयोग; आता लाखोंची कमाई PHOTOS
दरम्यान, शेतकरी धुमाळ हे पेरूची निर्यात महाराष्ट्रासह केरळमध्येही करतात. बाजारात तैवान पिंक पेरूला मागणी आहे. त्यामुळे त्याला भावही चांगला मिळतो. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनीही आधुनिक शेतीकडे वळत सेंद्रिय शेतीचा मार्ग पत्करावा, असे धुमाळ सांगतात.





