सहा महिन्यांपूर्वी हर्षिल एका अमेरिकन कंपनीत रिमोट जॉब करत होता. सर्व काही सुरळीत चाललं होतं. पण एका दिवसाच्या स्टँडअप कॉलमध्ये त्याला अचानक नोकरीवरून काढलं गेलं. कारण असं दिलं की हर्षिल नोकरीपेक्षा आपल्या स्टार्टअपकडे जास्त लक्ष देतोय. हर्षिलने मॅनेजर्सना विनंती केली, आणखी मेहनत करीन, काम वेळेत पूर्ण करीन; पण निर्णय झाला होता. हा त्याच्या मोठा धक्का होता.
advertisement
पुढील १०-१५ दिवस हर्षिल सतत विचार करत राहिला, परत सुरक्षित नोकरी शोधायची का, की स्वप्नांच्या दिशेने जोखीम पत्करायची? काही रेफरल्स मिळाले, संधीही मिळाली. पण मनातून त्याला जाणवलं, “आताच योग्य वेळ आहे. नाहीतर आयुष्यभर सुरक्षिततेच्या नावाखाली जोखीम घेणं टाळत राहीन.”
त्याच्या हातात फक्त नऊ महिन्यांचा रनवे होता. कारण त्याच्या हातात तेवढे महिने पुरतील एवढेच पैसे होते. त्याने ठरवलं, साधं राहायचं, दररोज स्वप्नासाठी काम करायचं. पालकांना मात्र हे सांगितलं नाही; आजही ते मानतात की मुलगा जुन्या नोकरीतच आहे. हर्षलच्या या प्रवासात त्याच्या सहसंस्थापक वसीमने देखील त्याला मदत केली, जेणेकरून हर्षिलवर अतिरिक्त भार येऊ नये.
या प्रवासात अनेक चढ-उतार आले. कधी महिनोन्महिने क्लायंट मिळाले नाहीत, तर कधी मोठ्या कंपन्यांनी हात मागे घेतले. या संघर्षाने हर्षिलला कठोर आणि धैर्यवान बनवलं. पण ऑक्टोबरपर्यंत त्याच्या स्टार्टअपने वेग धरला आणि तब्बल 44 लाख रुपयांचा (सुमारे 50,000 डॉलर) महसूल मिळवला. टीम एका व्यक्तीवरून दहा जणांपर्यंत वाढली आणि आता स्पॉन्सर्सही मिळाले.
जेव्हा त्याने ही गोष्ट सोशल मीडियावर (X) शेअर केली, तेव्हा ती चांगलीच व्हायरल झाली. हजारोंनी त्याच्या धैर्याचं कौतुक केलं. कुणी म्हणाले, “मीही अशाच परिस्थितीतून जातोय, पण तुमच्यामुळे धैर्य मिळालं.” तर कुणी थेट मदतीची ऑफर दिली. “डिझाइन, फायनान्स किंवा काहीही गरज असेल, सांग. काही परतफेड नको, फक्त पुढे जात राहा” असे मेसेजस केले.
हर्षिल तोमरची ही कथा केवळ एका स्टार्टअपच्या यशाची गोष्ट नाही. ती सांगते स्वप्नांचा पाठलाग करायचा असेल, तर जोखीम घ्यावीच लागते. धैर्य आणि संयम असेल, तर कितीही कठीण परिस्थिती असली तरी मार्ग नक्की सापडतो.