मुंबई: राज्यसभा निवडणुकीसाठी हालचालींना वेग आला आहे. रिक्त झालेल्या जागेवर कुणाला उमेदवारी मिळणार, याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या कोर कमिटीचे महत्त्वाची बैठक मुंबईमध्ये सुरू आहे. भाजपकडून ४ उमेदवारांची नाव दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये पहिलं नाव हे रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं नाव समोर आलं आहे.
advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपची कोअर कमिटीची बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची चर्चा झाली आहे. यामध्ये भाजपकडून चार उमेदवार देण्यात येणार आहे. भाजपकडून रामदास आठवले यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे. इतर तीन नावासंदर्भात कोर कमिटीच्या बैठकीत चर्चा पार पडणार आहे. या बैठकीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुधीर मुनगंटीवार सह अनेक नेते उपस्थितीत आहे.
रामदास आठवले हे एनडीएकडून २०१६ पासून राज्यसभेमध्ये खासदार म्हणून निवडून आले आहे. रामदास आठवलेंच्या राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ एप्रिल २०२६ मध्ये संपणार आहे. त्यामुळे भाजपच्या कोट्यातून त्यांची निवड होणार हे निश्चित झालं आहे.
भाजपकडून ४ तर शिंदे आणि अजितदादा गटाला १ जागा
दरम्यान, राज्यसभेच्या एकूण ७ जागांपैकी भाजप ४ जागा, शिवसेना शिंदे गट, अजित पवार गटाला प्रत्येकी एक-एक जागांवर विजय मिळवता येणार आहे. तर, महाविकास आघाडीला एका जागेवर विजय मिळवता येईल, एवढं संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपकडून १ जागेवर नाव ठरलं आहे आता इतर ३ जणांच्या नावावर शिक्कामोर्तब होतं हे पाहण्याचं ठरणार आहे.
भाजप टाकणार जुना डाव?
दरम्यान, राज्यसभा निवडणुकीमध्ये महायुती २०२२ चा फॉर्म्युला वापरू शकते. जर असं झालं तर महायुती ७ वी जागा लढवेल आणि संख्याबळाचा वापर करून महाविकास आघाडीला धक्का देईल. २०२२ मध्ये राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत असा प्रकार घडला होता. त्यावेळी संख्याबळ विरोधात असतानाही भाजपने अतिरिक्त जागा जिंकली होती. त्यामुळे आता भाजप कोअर कमिटीत काय ठरतं हे पाहण्याचं ठरेल.
