ही बस जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजना (JNNURM) अंतर्गत 2009 साली बेस्टच्या ताफ्यात दाखल झाली होती. त्यावेळी या योजनेअंतर्गत बेस्टला 750 विना वातानुकूलित (नॉन एसी) बसगाड्या मिळाल्या होत्या. सध्या मात्र मुंबईत वातानुकूलित (एसी) बसगाड्यांचा वापर वाढत चालल्याने या जुन्या नॉन एसी बसगाड्या हळूहळू सेवेतून बाहेर पडत आहेत
'1942’ बसचा निरोप सोहळा
advertisement
'1942’ ही बस अनेक वर्षं “सुरक्षितता हेच आमचं ध्येय” या ब्रीदवाक्यासह मुंबईच्या रस्त्यांवर धावत राहिली. या बसच्या निरोपानिमित्ताने ‘आपली बेस्ट आपल्यासाठी’ या संस्थेने आणि बेस्टप्रेमी नागरिकांनी मिळून एक विशेष निरोप सोहळा आयोजित केला. सकाळी गोराई आगारातून बस क्रमांक '1942' मधून प्रवास सुरू झाला आणि या बसने वांद्रे-वरळी सागरी सेतू व नव्याने तयार झालेल्या कोस्टल रोड मार्गे दक्षिण मुंबई गाठली.
याप्रवासादरम्यान बसने गेटवे ऑफ इंडिया, कुलाबा आणि बॅकबे यांसारख्या अनेक प्रतिष्ठित स्थळांना भेट दिली. हा प्रवास म्हणजे जणू तिच्या दीर्घ सेवेला दिलेला शेवटचा सलामच होता. बस चालक आणि कर्मचाऱ्यांसाठी ही क्षण अत्यंत भावनिक होते. “ही बस आमच्यासाठी केवळ वाहन नव्हती, तर आयुष्याचा भाग होती. रोज इंजिन सुरू करताना जणू एखादा मित्र भेटतोय असं वाटायचं,” असं एका कर्मचाऱ्याने सांगितलं.
बेस्ट वाचवणं म्हणजे मुंबईची ओळख जपणं
आपली बेस्ट आपल्यासाठी’ संस्थेचे रुपेश शेलटकर म्हणाले, “मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीचं जाळं बेस्टपासून सुरू होतं. पण निधीअभावी आणि चुकीच्या धोरणांमुळे बेस्टचा सुवर्णकाळ मागे पडत चाललाय. बेस्ट वाचवणं म्हणजे मुंबईचं अस्तित्व वाचवणं आहे.” आज ‘1942’ बस काळाच्या पडद्याआड गेली असली, तरी तिच्या लाल रंगात दडलेला इतिहास, आवाजातली ओळख आणि चाकांवर फिरणाऱ्या आठवणी या सर्व गोष्टी मुंबईकरांच्या मनात कायम राहतील.