मुंबई: विधान परिषद निवडणुकीत बहुतांश राजकीय पक्षांनी आपले आमदार फुटू नयेत, यासाठी 'हॉटेल पॉलिटिक्स'चा आधार घेतल्याच दिसत आहे. तरी कुणाचे तरी आमदार फुटणार हे आजवरच्या विधानपरिषद निवडणुकीच्या इतिहासातून स्पष्ट होतं आहे. विशेष करून अनेकांची नजर काँग्रेसच्या आमदारांवर आहे. कारण काँग्रेसकडे शिलकीचं संख्याबळ आहे. कदाचित म्हणूनच अजित पवारांनी काँग्रेसचे तीन आमदार गळाला लावल्याची खाञी लायक सूञाची माहिती आहे. तर दुसरीकडे शरद पवारांनी या आधीच अजित पवारांचे काही आमदार आपल्या गळाला लावून ठेवल्याची जोरदार चर्चा आहे.
advertisement
पवार काका पुतण्यामध्ये कोण कुणावर भारी? काँग्रेसच्या 3 आमदारांवर अजित पवारांचा डोळा असल्याचं सांगितलं जातं आहे. तर अजितदादांच्या आमदारांवर मोठ्या साहेबांनी म्हणजेच शरद पवारांनी जाळं टाकल्याचं बोलंलं जातं आहे. विधानपरिषदेत आपले दोन्ही आमदार प्रथम क्रमांकाच्या कोट्यातूनच निवडून आणण्यासाठी अजित पवार यांना पाच मतांची गरज आहे. त्यापैकी दोन अपक्ष आमदार आधीच्या अजित पवारांच्या बरोबर आहेत, तर आणखी तीन आमदार बाहेरून फोडावे लागणार आहेत.
करमाळ्याचे संजयमामा शिंदे आणि स्वाभिमानीचे देवेंद्र भोयर हे 2 अपक्ष आमदार अजित पवारांच्या दिमतीला आहेत. अजित दादांचे 41 आणि दोन अपक्ष असा हा आकडा 43 होतो. आणखी तीन आमदारांच्या मतांची दादा जुळवाजूळव कशी करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अजितदादांनी कसली कंबर, 48 तासांमध्ये करणार मोठी खेळी, फटका कुणाला?
शरद पवार काय खेळी खेळणार? एकीकडे अजित पवार आमदार काँग्रेसचे आमदार फोडणार, असा दावा केला जात असला तरी हा दावा खरा नाही, असं मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मांडलं आहे. बारामती लोकसभेच्या मैदानात पवार काकांनी पुरता धोबीपछाड दिल्याने अजितदादा यावेळी कोणतीही रिस्क घेऊ इच्छित नाहीत. म्हणूनच त्यांनी त्यांचे सर्व आमदार मतदान होईपर्यंत एका हॉटेलात नजरकैद करून ठेवले आहेत.पण त्यातल्याच काही आमदारांना आगामी विधानसभा ही शरद पवारांच्या तुतारीवर लढवायची असल्याने पवार साहेब त्यांच्यावर शेकापच्या जयंत पाटलांना मतदान करायला भाग पाडू शकतात, आणि खरंच तसं झालं आणि अजितदादांचा दुसरा उमेदवार पडला तर अजित पवारांचे यापुढचे राजकीय भवितव्यच धोक्यात येऊ शकते. त्यामुळे पवार - काका पुतण्यामध्ये नेमकी कोण बाजी मारणार, हे विधानपरिषदेच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
