मुंबई : रस्त्यांवरील खड्डे आणि पावसामुळे वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या मुंबईकरांना आता आणखी मनस्ताप सहन करावा लागणार आहे. चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर मुंबईत पुन्हा एकदा रस्त्यांचे काँक्रीटीकरण सुरू करण्यात आले आहे. एक ऑक्टोबरपासून रस्त्यांच्या कामाला सुरुवात होणार झाली आहे. त्यामुळे आता काही ठिकाणी या कामांमुळे वाहतूक कोंडीची भीती व्यक्त केली जात आहे.
advertisement
मुंबई महापालिकेकडून शहर-उपनगरातील सगळ्याच रस्त्यांच्या काँक्रीटीकरणचा काम हाती घेण्यात आले होते. पावसाळ्यात हे कामे थांबवण्यात आली होती. आता अपूर्ण कामे पूर्ण करण्यावर महापालिकेकडून भर दिला जाणार आहे. मुंबई महापालिकेकडून प्रथम अंशतः काँक्रीटीकरण केलेल्या 574 रस्त्यांवर काम करेल आणि त्यानंतर आणखी 776 नवीन रस्ते काँक्रीटीकरणाचे काम हाती घेणार आहेत. लोकांना त्रास होऊ नये म्हणून 12 मीटरपेक्षा अरुंद रस्ते काँक्रीटीकरण करता येणार नाही, असे मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. अनेक ठिकाणी एकाच वेळी रस्त्यांचे काम केल्याने लोकांना मोठी गैरसोय होते. त्यामुळे एकाच वेळी कामे करण्यात येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बीएमसीच्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2023 मध्ये सुरू झालेल्या रस्ते काँक्रीटीकरण प्रकल्पाच्या अर्ध्याहून अधिक (50.19%) काम पूर्ण झाले आहे. ‘खड्डेमुक्त मुंबई’ प्रकल्पाचा पहिला टप्प्यातील 700 रस्त्यांचे काम प्रगतीपथावर असून 63.53 टक्के काम पूर्ण झाले आहे. तर, दुसऱ्या टप्प्यातील 1421 रस्त्यांचे काम 36.84 % पूर्ण झाले आहे. प्रकल्पाअंतर्गत 2121 रस्त्यांपैकी 771 रस्त्यांचे पूर्णपणे काँक्रीटीकरण झाले आहे. तर, 574 रस्त्यांचे काम अंशतः पूर्ण झाले आहेत, तर 776 रस्त्यांचे काम अद्याप सुरू झालेले नाही. पुढील तीन ते चार महिन्यांत अर्धवट काँक्रीटीकरण केलेले रस्ते पूर्ण करण्याचे बीएमसीचे उद्दिष्ट आहे, असल्याचे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी हिंदुस्तान टाइम्सला सांगितले.
अंशतः काँक्रीटीकरण केलेले बहुतांशी रस्ते पश्चिम उपनगरांमध्ये असून 360 इतकी संख्या आहे. तर काँक्रीटीकरण न केलेले रस्ते हे मुंबई शहराच्या हद्दीतील आहेत. या भागातील कंत्राट रद्द करण्यात आले होते. बीएमसीच्या रस्ते काँक्रीटीकरणाच्या नवीन धोरणामुळे स्थानिक मागणीनुसार काँक्रीटीकरण करण्यात येणार आहेत. मुंबईतील काही भागांमधील रहिवाशांनी गेल्या वर्षी रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाला आक्षेप घेत रस्ते चांगल्या स्थितीत असल्याचा दावा केला होता. ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे, त्यामुळे पूर्ण रस्ता काँक्रीटीकरणासाठी उपलब्ध नाही, त्याठिकाणी अतिक्रमण हटवेपर्यंत काँक्रीटीकरण पुढे ढकलले जाईल. तरीही, स्थानिक पातळीवर जोरदार मागणी असल्यास काँक्रीटीकरण केले जाऊ शकते, अशी माहिती बांगर यांनी दिली.