प्रवास कसा असेल?
मुंबई वॉटर मेट्रोमध्ये हायब्रीड इलेक्ट्रिक बोट्स धावतील. मुंबईत वॉटर मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 8 महत्त्वाच्या मार्गांवर जलवाहतूक सेवा सुरू होणार आहे. या बोटींमध्ये प्रवाशांसाठी प्रशस्त आसनव्यवस्था, एसी डबे, सुरक्षित प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी वेगवेगळे गेट्स असतील. प्रवास करताना खिडकीतून दिसणारा समुद्राचा नजारा हा लोकल किंवा बसपेक्षा वेगळाच अनुभव देईल. प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर आधुनिक टर्मिनल्स उभारले जाणार असून, ते मेट्रो स्थानकांप्रमाणे स्वच्छ, वातानुकूलित व सुरक्षित असतील.
advertisement
मुंबईतील वाहतूक कोंडी सुटणार, ‘या’ मार्गावरचा केबल-स्टेड ब्रिज खुला होणार, डेडलाईन ठरली!
तिकिट खरेदीसाठी मोबाइल अॅप, क्यूआर कोड बुकिंग यासोबतच ‘कॉमन कार्ड प्रणाली’ची सुविधा उपलब्ध असेल. म्हणजेच एकाच कार्डद्वारे प्रवासी लोकल, मेट्रो, बस आणि वॉटर मेट्रोमध्ये सहज प्रवास करू शकतील.
सुरुवातीचे मार्ग
पहिल्या टप्प्यात नरिमन पॉइंट–बांद्रा आणि बांद्रा–वर्सोवा हे दोन मार्ग निश्चित झाले आहेत. तसेच मीरा-भाईंदर, वसई, गेटवे ऑफ इंडिया, मांडवा, कल्याण अशा महत्त्वाच्या भागांना जोडण्याचे नियोजन सुरू आहे. या मार्गांवर जलवाहतुकीमुळे केवळ वेळच वाचणार नाही, तर प्रवासही अधिक सुखकर होणार आहे.
पर्यावरणपूरक व पर्यटनाला चालना
पारंपरिक डिझेल इंजिनांच्या बोटींऐवजी हायब्रीड इलेक्ट्रिक बोट्समुळे प्रदूषण कमी होणार आहे. त्यामुळे हा प्रवास केवळ जलदच नाही, तर पर्यावरणपूरकही ठरेल. शिवाय गेटवे ऑफ इंडिया, मांडवा, वसई यांसारख्या पर्यटनस्थळांना थेट जोडणी झाल्याने देशी-विदेशी पर्यटकांसाठीही ही सेवा आकर्षण ठरणार आहे.
मुंबईकरांसाठी नवा पर्याय
रस्त्यावरची वाहतूककोंडी आणि लोकलची गचांडी टाळून, मुंबईकरांना आता समुद्रमार्गे मोकळा, सुखकर आणि वेळेची बचत करणारा प्रवास मिळणार आहे. नोकरीवर जाणारा प्रवासी असो की पर्यटक वॉटर मेट्रो प्रत्येकासाठी एक नवा अनुभव ठरणार आहे.