या 69.23 किमी लांबच्या कॉरिडॉरमुळे नवी मुंबईतील पनवेलपासून थेट बोरिवली आणि वसईपर्यंत सहज पोहोचता येणार आहे. प्रवाशांना कुर्ला किंवा वडाळा येथून ट्रेन बदलण्याची गरज नाही, ज्यामुळे नोकरीसाठी नवी मुंबईतून मुंबईच्या पश्चिमेकडे जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचेल. तसेच, पश्चिम रेल्वे मार्गावर राहणाऱ्यांना पुणे किंवा गोव्याला जाताना थेट पनवेल स्टेशनवर पोहोचण्याची सुविधा मिळणार आहे. सद्यस्थितीत पनवेल-दिवास-वसई असा एक रेल्वे मार्ग आहे, पण हा नवीन कॉरिडॉर त्या मार्गाला न स्पर्श करता स्वतंत्रपणे तयार केला जाणार आहे.
advertisement
भिवंडी आणि पलावा परिसरात राहणाऱ्यांसाठी हा प्रकल्प विशेष फायदेशीर ठरणार आहे. लूम पॉवर इंडस्ट्रियल क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या भिवंडी शहराला नवी मुंबई आणि मुंबई पश्चिमेशी थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. तसेच, शिळफाटा रस्त्यावर असलेल्या पलावा, रुणवाल सिटीसारख्या वसाहतींना थेट बोरिवली, वसई आणि पनवेलशी कनेक्टिव्हिटी मिळेल, ज्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुलभ होईल.
हा प्रकल्प 12710.82 कोटींच्या खर्चात राबविला जाणार असून, एकूण 19 रेल्वे स्टेशन या मार्गावर उभारले जातील. जुचंद्र, कामन रोड, पाये गाव, खरबाव, डुंगे, कलवार, भिवंडी रोड, पिंपळस, नवी डोंबिवली, कोपर, निळजे, नांदवली, नारिवली, निघू, तळोजे पानचंद, पिंढार, नवाडे रोड, कळंबोली, तेंबोडे आणि नवीन पनवेल हे प्रमुख स्टेशन असतील.
या कॉरिडॉरमुळे पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गांवरील ताण कमी होण्याची अपेक्षा आहे. सध्या पश्चिम रेल्वेवर जाण्यासाठी प्रवाशांना हार्बर आणि मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला, दादरवरून प्रवास करावा लागतो. नवीन कॉरिडॉरमुळे हा ताण कमी होईल आणि पश्चिम उपनगरातील प्रवाशांना पनवेलहून थेट पुणे, गोवा किंवा इतर दूरच्या प्रवासासाठी ट्रेन पकडणे सुलभ होईल.
याशिवाय, MUTP III-B अंतर्गत बदलापूर-कर्जत दरम्यान तिसरी लाइन आणि आसनगाव-कसारा दरम्यान चौथी लाइनसाठी अनुक्रमे 1325.02 कोटी आणि 871.63 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या सर्व उपक्रमांसाठी एकूण बजेट 14907 कोटी रुपये आहे. या प्रकल्पामुळे मुंबईतील पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी मजबूत होईल, प्रवाशांचा वेळ वाचेल, आणि उपनगरातील रेल्वे नेटवर्क अधिक कार्यक्षम होईल.