मुंब्रा येथील दुर्घटनेनंतर रेल्वे प्रवासाच्या सुरक्षेविषयी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले होते. मुंबई आणि उपनगरांतील प्रचंड गर्दीमुळे दररोज 1 ते 2 प्रवासी लोकलमधून पडून जीव गमवात आहेत. विशेषत: ठाणे-डोंबिवली मार्गावरील अपघातांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने सर्वसामान्य लोकलमध्येही स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता 'स्वयंचलित दरवाज्यांचा' पहिल्या प्रोटोटाइप कोचची निर्मिती झाली आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार आज (3 ऑगस्ट) या कोचची पाहणी करतील, अशी शक्यता आहे.
advertisement
Mumbai Pigeon: कबुतरांना खाऊ घालणं आता पडणार महागात, मुंबईत पहिला गुन्हा दाखल
व्हेंटिलेशनसाठी जाळी
सामान्य लोकलसाठी स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर अनेकांनी श्वास गुदमरण्याची शक्यता व्यक्त केली होती. ही बाब देखील रेल्वेने विचारात घेतली आहे. तयार करण्यात आलेला प्रोटोटाइप हा 'सिमेन्स' प्रकारातील लोकलवर आधारित आहे. प्रवाशांसाठी हवा खेळती राहावी यासाठी दरवाज्यांवर जाळी बसवण्यात आली आहे. छतावरील व्हेंटिलेशन युनिट, वेस्टिब्यूल डिझाइन आणि दरवाज्यांच्या यंत्रणेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
मध्य रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा फक्त एक प्रोटोटाइप आहे. त्याला अद्याप अंतिम मान्यता मिळालेली नाही. एकाच कोचमध्ये ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. तयार केलेल्या प्रोटोटाइपचा प्रयोग यशस्वी झाला तर चैन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये अशा आणखी कोचची निर्मिती केली जाईल.
पश्चिम रेल्वेने यापूर्वी डिसेंबर 2019 मध्ये देखील असाच प्रयोग केला होता. तीन कोचमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवले गेले होते. मात्र, हा प्रयोग यशस्वी झाला नव्हता.
लोकलची संख्या वाढणार
मध्य रेल्वेवर प्रवासी वाहतुकीचा प्रचंड ताण आहे. लोकलची संख्या कमी पडत असल्याची ओरड प्रवासी करत आहेत. लोकलवरील ताण कमी करण्यासाठी डिसेंबर 2025 पर्यंत 15 डब्यांच्या लोकलची संख्या वाढवण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासन करणार आहे. लोकलची संख्या वाढली तर सुमारे 40 ते 50 फेऱ्यांची भर पडेल.