काहीतरी संशयास्पद आहे - संजय राऊत
अजित पवार यांच्या अपघातावर प्रश्न नक्कीच उपस्थित केले जातील, प्रश्न विचारलेच पाहिजेत. अजित पवार यांच्यासारख्या महाराष्ट्राच्या एका मोठ्या नेत्याचा ज्या पद्धतीने विमान अपघातात मृत्यू झाला आणि जे तथ्य समोर येत आहेत - त्याची चौकशी झाली पाहिजे, मला वाटतं की यात काहीतरी संशयास्पद आहे, असं संजय राऊत म्हणाले. त्यानंतर त्यांनी मोठे आरोप केले.
advertisement
मृत्यू नैसर्गिक नसून त्यामागे मोठे कारस्थान - संजय राऊत
अजित दादांच्याच पक्षातील लोकांकडून आता हे प्रश्न उपस्थित केले जात आहेत, ही बाब त्यांनी अधोरेखित केली. पडद्यामागे नक्कीच काहीतरी घडले आहे, असा खळबळजनक आरोप करताना त्यांनी म्हटलं की, हा मृत्यू नैसर्गिक नसून त्यामागे मोठे कारस्थान असण्याची दाट शक्यता आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
अवघ्या 10 दिवसांतच रहस्यमयरीत्या मृत्यू
राऊत यांनी पुढे एक खळबळजनक खुलासा करताना सांगितलं की, काही दिवसांपूर्वी अजित दादांनी आपण 'स्वगृही' परतण्यास इच्छुक असल्याचे बोलून दाखवले होते. मात्र, त्यानंतर लगेचच भाजपच्या नेत्यांकडून त्यांना जुन्या सिंचन घोटाळ्याच्या (Sinchan Scam) फाईल्स उघडून धमकावण्यात आले होते. या धमकीला अजित पवार यांनी चोख प्रत्युत्तरही दिलं होते, परंतु या प्रसंगानंतर अवघ्या 10 दिवसांतच त्यांचा रहस्यमयरीत्या मृत्यू झाला. ही बाब अनेक शंकांना वाव देणारी असल्याचे राऊत म्हणाले.
जस्टिस लोया प्रकरणाची आठवण
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची तुलना संजय राऊत यांनी थेट 'जस्टिस लोया' यांच्या प्रकरणाशी केली आहे. "या सर्व घटनाक्रमावरून आपल्याला काय समजते? हे सर्व पाहून जस्टिस लोया प्रकरणाची आठवण येते," असं खळबळजनक विधान संजय राऊतांनी केलं आहे. कोणीतरी जाणीवपूर्वक हे घडवून आणलं आहे का? असा सवाल त्यांनी विचारला आहे. अजितदादांच्या मृत्यूच्या मागे असलेल्या गुढ सत्याचा शोध घेण्यासाठी विशेष तपास यंत्रणेमार्फत चौकशीची मागणी आता जोर धरू लागली आहे.
