महापालिका निवडणुकीनंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र नव निर्माण सेनेची बैठक मुंबईतील एमआयजी क्लब वांद्रे इथं पार पडली. या बैठकीत अध्यक्ष राज ठाकरे यांची पालिका निवडणुकीचा आढावा घेतला. मनसे पक्ष कुठे कुठे कमी पडला, याची माहिती राज ठाकरेंनी जाणून घेतली. यावेळी राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद साधला. निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये काय काय घडलं, यावेळी पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या मनातील खदखद राज ठाकरे यांच्यासमोर व्यक्त केली.
advertisement
"आपल्याला योग्य जागा मिळाल्या नाहीत, शिवाय मिळालेल्या अनेक जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून मदत झाली नाही. अपक्ष ही उमेदवार उभे करण्यात आले होते, अशी तक्रारच पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंपुढे मांडली.
पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर 'आता तक्रारी नको कामाला लागा' अशी सूचनाच राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिली. मराठीच्या मुद्यावर आणखी प्रभावीपणे काम करा, असा आदेशही कार्यकर्त्यांना दिला.
बैठकीत काय चर्चा झाली?
पालिका निवडणुकीतील सगळ्या मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली. पक्षांतर्गत मुद्दे होते, त्यामुळे ते ऑन कॅमेरा सांगणार नाही. राज ठाकरे यांनी कधीही तामिळ लोकांबद्दल बोलले नाही. त्यांनी केवळ अन्नामलाई यांच्याबद्दल बोलले होते. भाजपचे जे काही नेते आहेत त्यांना सांगा. अशा कोणत्याही प्रकारची चर्चा नाही. आमची कुणाही बरोबर चर्चा झालेली नाही. पक्षांतर्गत बदल होत असतात तसे बदल होतीलच, असं यावेळी संदीप देशपांडेंनी सांगितलं.
मनसेचा भाजपला पाठिंबा नाही
दरम्यान, मुंबई महापालिकेत मनसेकडून भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देणारी अशी बातमी समोर आली होती. आज मुंबई महापालिका मुख्यलयात भाजप आणि शिवसेनेचे नवनिर्वाचीत नगरसेवक एकत्र गट नेता निवडीसाठी जमले होते. यावेळी मुंबईतील मनसेचे ६ नगरसेवक भाजपला पाठिंबा देणार असल्याची बातमी समोर आली होती. त्यामुळे मनसेच्या गोटात एकच खळबळ उडाली. पण ही बातमी खोटी आहे, मनसे भाजपला कधीच पाठिंबा देणार नाही, जे काही ते मी सांगेन, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच वृत्त फेटाळून लावलं.
