गुरूवार (19 मार्च 2026) गुढीपाडवा आणि शनिवार (21 मार्च 2026) रमजान ईद असे दोन्हीही सण लागोपाठ येत असल्यामुळे पोलिसांकडून रेल्वे स्टेशनसह इतरत्र ठिकाणीही कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार आहे. या बंदोबस्ताच्या काळामध्ये पोलिसांकडून प्रत्येक प्रवाशाची बॅग तपासूनच त्यांना पुढच्या प्रवासासाठी पाठवले जाणार आहे. शिवाय, सध्या आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस सिलिंडर आणि इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे अनेक नागरिक शहरातून आपल्या गावी जाताना दिसत आहेत. त्यामुळे कदाचित चेंगरा चेंगरी, चोरीच्या घटना किंवा महिलांची छेडछाड अशा अनेक घटना घडण्याची शक्यता सर्वाधिक आहे.
advertisement
रेल्वे स्टेशनवरील प्रत्येक ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची प्रवाशांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे. पोलिसांना जर कुठेही काही संशयास्पद आढळून आल्यास पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील रेकॉर्डिंगची तपासणी करण्यात येत असून श्वान पथक, बॉम्ब शोधक आणि निकामी पथकद्वारे नियमित तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. रेल्वे पोलीस आणि आरपीएफकडून यांच्याकडून स्टेशनवर असणाऱ्या स्टॉलधारकांना, फेरीवाल्यांना, हमालांना, बूट पॉलिशवाल्यांना आणि सफाई कामगारांना सुद्धा सुरक्षेचे धडे दिले जात आहेत. परिसरामध्ये जर कुठेही मारामारी किंवा कोणताही विचित्र प्रकार जर घडला तर तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. सोबतच पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही पोलिसांनी केलेले आहे.
रेल्वे परिसरात काम करत असताना बेवारस बॅग, संशयास्पद वस्तू किंवा संशयास्पद व्यक्ती दिसल्यास त्याची माहिती तत्काळ कर्तव्यावरील रेल्वे पोलीस आणि आरपीएफला द्यावी. तसेच रेल्वेकडे मदतीसाठी 1512 किंवा 139 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले. आरपीएफ आणि रेल्वे पोलीस यांच्याकडून मुंबई आणि उपनगरातील प्रमुख रेल्वे स्टेशन परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त दिला जाणार आहे.
