वसई-विरार पट्ट्यात गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. गॅस पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खानावळींच्या कामकाजावर गंभीर परिणाम होत आहे.या संदर्भात हॉटेल व्यावसायिकांनी वारंवार पाठपुरावा करूनही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. नुकतीच या प्रश्नावर पालघर जिल्हाधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक देखील पार पडली, मात्र अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. अनेकांनी शेगड्यांवर अन्न शिजवणे सुरू केले असले तरी तेही मर्यादित असून गॅसचा पुरवठा पुढील ४८ तासांत सुरळीत झाला नाही, तर वसई-विरारमधील शेकडो हॉटेल्स आणि खानावळींना आपले कामकाज अनिश्चित काळासाठी बंद ठेवावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
advertisement
हॉटेल व्यवसाय हा या भागातील मोठ्या प्रमाणावर रोजगार देणारा उद्योग असून, हॉटेल्स बंद झाल्यास हजारो कामगार, आचारी तसेच होम डिलिव्हरी करणाऱ्या युवकांच्या उपजीविकेवर मोठे संकट येऊ शकते. त्याचबरोबर रोजच्या जेवणासाठी हॉटेल्सवर अवलंबून असलेल्या नागरिकांनाही मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागेल.
“परिस्थिती आता हाताबाहेर जात आहे. अनेक हॉटेल्समध्ये गॅसचा साठा संपत आला आहे. इंधनाशिवाय आम्ही व्यवसाय करू शकत नाही. प्रशासनाने आणि गॅस एजन्सींनी या प्रश्नाकडे आपत्कालीन स्थिती म्हणून लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात.”दरम्यान, वसई तालुका हॉटेल असोसिएशनने प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करून व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी प्रीतम सिंग गोहनिया (सल्लागार वसई तालुका हॉटेल असोसिएशन) यांनी केली आहे.
