इस्रोचे माजी अध्यक्ष के. सिवन म्हणाले की लँडर आणि रोव्हरला जागं करण्याच्या प्रयत्नात अनेक नवीन गोष्टी समोर येतील अशी आशा आहे. “आम्हाला वाट बघावी लागेल. ती लुनार रात्र गेली. आता लुनार दिवस सुरू होतो. त्यामुळे आता तो जागं होण्याचा प्रयत्न करेल.
सर्व यंत्रणा कार्यान्वित झाल्या तर ठीक होईल...पण तसं झालं नाही तरीही हरकत नाही. भविष्यात नवीन वैज्ञानिक पद्धती विकसित होतील. आताही चांद्रयान-1 च्या डेटाने अनेक शोध लावले आहेत. त्यामुळे अनेक नवीन गोष्टी समोर येतील अशी आशा आहे. शास्त्रज्ञ प्रयत्न करत राहतील. त्यामुळे, हा कथेचा शेवट नाही,” असं ते म्हणाले.
advertisement
राज्यमंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर सूर्यप्रकाश आल्यानंतर जागे होतील. संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी लोकसभेत या विषयी माहिती देताना सिंह म्हणाले, “जेव्हा चंद्रावर सूर्याप्रकाश येईल तेव्हा काही तासांनंतर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर जागे होतील. त्यासाठी आम्ही सौर बॅटरीची व्यवस्था केली आहे आणि पॅनेल अशा दिशेने सेट केले आहेत की विक्रमवर सूर्यकिरणं पडल्यावर एक कम्युनिकेशन सर्किट अॅक्टिव्ह होईल. विक्रम आणि प्रज्ञान दोघेही वेक-अप कॉलची वाट पाहत आहेत.”
इस्रोने एक्सवर पोस्ट केली आहे. "आज चंद्रावरील शिवशक्ती पॉइंटवर सूर्योदय होणं अपेक्षित आहे आणि लवकरच विक्रम आणि प्रज्ञान यांना वापरण्यायोग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळेल. आम्ही विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर 22 सप्टेंबर रोजी त्यांच्याशी पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू करण्यापूर्वी एका विशिष्ट तापमानापेक्षा जास्त गरम होण्याची प्रतीक्षा करू," असं त्यात म्हटलं आहे.
स्पेस एजन्सीने 2 सप्टेंबर रोजी सांगितलं होतं की प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावर त्याची असाइनमेंट पूर्ण केली आहे आणि सुरक्षितपणे पार्क करून स्लीप मोडमध्ये सेट केलंय. 4 सप्टेंबरपासून शिवशक्ती पॉइंटवर सूर्यास्त झाल्यापासून लँडर आणि रोव्हर दोन्ही यंत्रं पूर्ण अंधारात आहेत.
भारताचे चांद्रयान-3 हे 14 जुलै रोजी प्रक्षेपित करण्यात आले होते. 23 ऑगस्ट रोजी ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरले. तेव्हापासून, प्रज्ञान आणि विक्रम या दोघांनी इस्रोकडे खूप सारा डेटा पाठवला आहे, त्यापैकी काही डेटा इस्रोने सार्वजनिक केला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा जगातला पहिला देश ठरला. मिशनच्या यशानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणात विक्रम लँडरचा लँडिंग पॉइंट 'शिवशक्ती' म्हणून ओळखला जाईल, अशी घोषणा केली.
त्याचबरोबर “चांद्रयान-2 ने चंद्राच्या पृष्ठभागावर ज्या ठिकाणी आपले फूटप्रिंट सोडले ते ठिकाण ‘तिरंगा’ म्हणून ओळखले जाईल. भारताने केलेल्या प्रत्येक प्रयत्नासाठी हे प्रेरणादायी ठरेल. हे आम्हाला आठवण करून देईल की कोणतंही अपयश अंतिम नसते,” असं त्यांनी म्हटलं होतं.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चांद्रयान-3 ही देशासाठी एक मोठी उपलब्धी असल्याचं म्हटलं होतं. तसेच अनेक विकसित देश आहेत, ज्यांच्याकडे संसाधनं असूनही ते अजूनही चंद्रावर पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर भारताने मर्यादित संसाधनांसह यश मिळवलं आहे, असंही ते म्हणाले होते.