यंदाची दिल्ली विधानसभा निवडणूक तिरंगी पार पडली. आम आदमी पार्टी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष इंडिया आघाडीचा भाग आहेत. लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवली होती. मात्र आता दिल्ली विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात निवडणूक लढवली. काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी प्रचाराच्या काळात एकमेकांवर जोरदार टीकास्र सोडलं. आता दिल्लीतील तिरंगी लढतीचा फायदा भाजपला होताना दिसत आहे.
advertisement
सकाळी पावणे दहापर्यंत हाती आलेल्या कलानुसार, भाजपनं 48 जागांवर आघाडी मिळवली आहे. तर 21 जागांवर आम आदमी पार्टीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तिरंगी लढतीत काँग्रेसचं मात्र पानीपत होताना दिसत आहे. काँग्रेसला केवळ एका जागेवर आघाडी मिळाली आहे. अपक्षांच्या खात्यात मात्र अजूनही भोपळा आहे. कोणत्याही अपक्ष उमेदवाराला अपेक्षित यश मिळालं नाहीय. पुढील दोन तास हाच कल कायम राहिला तर दिल्लीत सत्तांतर होणं फिक्स समजलं जाईल. त्यानंतर लीड कापणं अवघड होऊ शकतं.
धक्कादायक बाब म्हणजे सुरुवातीच्या कलांमध्ये माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, विद्यमान मुख्यमंत्री अतिशी सिंह आणि मनीष सिसोदिया असे आम आदमी पार्टीचे महत्त्वाचे नेते पिछाडीवर असल्याचं दिसून आलं होतं. पण त्यानंतर अटीतटीच्या लढतीत केजरीवाल आणि सिसोदिया यांनी लीड कापल्याची बातमी समोर येत आहे. मात्र अतिशी सिंह अजूनही पिछाडीवरच आहेत. 2014 सालापासून देशात भाजपची सत्ता असूनही दिल्ली विजयाचं भाजपाचं स्वप्नं काही साकार झालेलं नव्हतं, त्यामुळे यंदाच्या निवडणूकीत भाजपाने आपली सर्व ताकद पणाला लावली. 2013, 2015 आणि 2020 असं सलग तीन वेळा आम आदमी पक्षाने निर्विवाद यश मिळवल होतं. आता दिल्लीत भाजपचं कमळ फुलताना दिसत आहे.