अध्यात्म आणि साहस यांचा संगम
नंदा देवी हे केवळ एक उंच पर्वतशिखर नाही. तर उत्तराखंडच्या लोकआस्था, श्रद्धा आणि परंपरेचा आधार आहे. दर 12 वर्षांनी होणारी नंदा राज जात यात्रा या पर्वताच्या धार्मिक-सांस्कृतिक महत्त्वाचं प्रतीक मानली जाते. ही यात्रा नंदा देवीला तिच्या माहेरातून सासरी पाठवण्याच्या पुरातन समजुतीवर आधारित आहे आणि यामध्ये हजारो लोक सहभागी होतात.
advertisement
पर्यटन विभागाच्या माहितीनुसार, नंदा देवी पुन्हा पर्वतारोहणासाठी खुलं करण्याच्या प्रस्तावावर अलीकडेच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पर्यटन सचिव धीरज सिंह गर्ब्याल होते. या वेळी इंडियन माउंटेनियरिंग फाउंडेशन (IMF) ने औपचारिक प्रस्ताव मांडत अनुभवी पर्वतारोहकांसाठी हे शिखर पुन्हा उघडावं, अशी शिफारस केली.
प्रसिद्ध पर्वतारोहींचा सकारात्मक प्रतिसाद
प्रख्यात पर्वतारोही शशि बहुगुणा यांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. त्यांच्या मते, नंदा देवी हे एक तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक शिखर आहे. जे जगभरातील पर्वत प्रेमींना आकर्षित करतं. इथे ट्रेकिंग केल्यामुळे रोमांच वाढेलच शिवाय स्थानिक पर्यटन व रोजगारालाही चालना मिळेल.
पण… हे कितपत सुरक्षित आहे?
मात्र या निर्णयावर सर्वचजण समाधानी नाहीत. काही पर्यावरण तज्ज्ञ आणि पर्वतारोही यांच्यात चिंता व्यक्त होत आहे. तरुण महारा या पर्वतारोहन तज्ज्ञाने स्पष्ट इशारा दिला आहे की सरकारने या निर्णयात घाई करू नये, कारण अजूनही त्या भागात विकिरण म्हणजेच Radiation चा धोका संभवतो.
1965 मधील ‘रहस्यमय मिशन’ पुन्हा चर्चेत
ही चिंता उगाच नाही तर तिचा थेट संबंध आहे 1965 मध्ये झालेल्या गुप्त मिशनशी. अमेरिकेची गुप्तचर संस्था CIA आणि भारताची Intelligence Bureau यांनी एकत्रितपणे चीनवर नजर ठेवण्यासाठी नंदा देवीच्या शिखरावर एक अण्विक डिव्हाईस बसवला होता. त्या उपकरणामध्ये सुमारे 5 किलो प्लुटोनियम-238 होता. मात्र एका हिमस्खलनामुळे ते उपकरण तिथेच हरवलं आणि आजतागायत सापडलेलं नाही.
वैज्ञानिकांचा अंदाज आहे की, जर ते उपकरण वितळलं किंवा त्यातून रेडिएशन झिरपलं तर ते आजही पर्यावरणासाठी अत्यंत घातक ठरू शकतं. त्यामुळे काही तज्ज्ञ सरकारच्या योजनेविषयी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देत आहेत.
नवीन संधी की जुना धोका?
शिखर उघडण्यापूर्वी सर्व प्रकारच्या सुरक्षा चाचण्या आणि शास्त्रीय अभ्यास केले जातील, असे सरकारने म्हटले आहे. मात्र नंदा देवीतील हे अदृश्य अण्विक रहस्य अजूनही धोका ठरू शकतो अशी भीती पर्यावरणप्रेमी आणि पर्वत तज्ज्ञांना वाटते.