भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरघची यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली. पश्चिम आशियातील बिघडत चाललेली परिस्थिती आणि जागतिक व्यापारी जहाजांची सुरक्षा यावर या संभाषणात भर देण्यात आला.
भारतावर इंधन संकट अधिकच गडद झाले आहे. अनेक ठिकाणी एलपीजीचा पुरवठा विस्कळीत झाल्याचे चित्र असल्याने देशात नवीन संकट निर्माण होण्याची भीती आहे. गॅस अभावी उद्योग बंद करण्याची वेळ आल्याने उत्पादन, रोजगार थंडावले आहेत. तर, रेस्टोरंट्स-हॉटेलही बंद होऊ लागली आहेत. घरगुती ग्राहकांना देखील एलपीजीसाठीचा वेटिंग पीरियड वाढला आहे.
advertisement
मोजतबा खामेनी यांच्या नियुक्तीनंतर पहिलीच चर्चा
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांची अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त लष्करी हल्ल्यात हत्या झाल्यानंतर त्यांचे पुत्र मोजतबा खामेनी यांची नवे सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या मोठ्या राजकीय बदलानंतर दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमधील ही पहिलीच चर्चा होती. डॉ. जयशंकर यांनी सोशल मीडियावर माहिती दिली की, "मी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संघर्षाच्या ताज्या घडामोडींवर चर्चा केली असून आम्ही सतत संपर्कात राहण्याचे मान्य केले आहे."
होर्मुझची सामुद्रधुनी बंद, भारताची चिंता वाढली
इराणने जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) हा मार्ग जवळजवळ बंद केला आहे. जगातील २० टक्के तेल आणि नैसर्गिक वायूचा व्यापार याच मार्गातून होतो. या निर्णयामुळे जागतिक बाजारात इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. भारत आपल्या गरजेच्या ८५ टक्के तेल आयात करत असल्याने, पुरवठा साखळी विस्कळीत होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
१ कोटी भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न
आखाती देशांमध्ये अंदाजे १ कोटी भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत. युद्धाच्या या स्थितीत त्यांची सुरक्षा ही भारत सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सरकारने संसदेत निवेदनात स्पष्ट केले. परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर यांनी जर्मनीचे परराष्ट्र मंत्री जोहान वाडेफुल आणि दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री चो ह्युन यांच्याशीही चर्चा करून या जागतिक संकटावर विचारविनिमय केला आहे.
